नवी मुंबई: समाज माध्यमातून संपर्क करीत गुंतणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र तरीही अशा ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे. अशाच ठिकाणी गुंतवणूक करून नवी मुंबईतील एका व्यक्तीची ४५ लाख ६९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

खारघर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने इंस्टाग्राम सहज म्हणून पाहत असताना त्यांना स्टोक लॉस रिकव्हरी नावाची लिंक दिसली . त्यावर क्लिक करताच त्यांचा समावेश बॉण्ड सिक्योरिटी नावाचा त्यांच्या व्हाट्स अप समूहात झाला. त्याचे प्रशासक शरीफ सिंग म्हणून होते. ते रोज दुपारी १२ वाजता सट्टा बाजारात कसे व्यवहार करावे याची शिकवणी देत होते. तसेच समूहात सर्व सदस्य किती गुंतवणूक केली किती परतावा मिळाला. कमी अवधीत लाखो रुपये मिळवले अशाच पद्धतीच्या चर्चा करत होते. याला भुलून फिर्यादी यांनीही गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर किती गुंतवणूक केली आणि किती परतावा मिळाला हे पाहण्यासाठी एक ऍप फिर्यादींना डाऊन लोड करण्यास लावले. आठ मार्च ते १४ मार्च दरम्यान तीन वेळा दहा आणि एक वेळा वीस हजार त्यांनी भरले.

हेही वाचा : भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

काही दिवसात त्याचा परतावा १ लाख २० हजार आलाही. त्यामुळे यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर १० हजार ते पाच लाख अशा विविध रकमा त्यांनी ऑनलाईन फिर्यादीने दिलेल्या विविध खात्यात भरल्या. त्याचा परतावा मागितला असता विविध कर रूपात पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. अशा पद्धतीने ८ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान तब्बल ४५ लाख ६९ हजार ५०० फिर्यादी यांनी दिले त्याचा परतावा म्हणून ९८ लाख ६ हजार ५५४ रुपये ऍप वर दिसत होता. मात्र प्रत्यक्ष बँक खात्यात दमडी जमा होत नव्हती आणि पैशांची मागणी संपत नव्हती. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.