नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आज (शुक्रवार, ०२) एपीएमसी फळ बाजार परिसरात मोठी तपास मोहीम हाती घेतली. या कारवाईत १५० संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ओळखपत्रांची आणि नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी एपीएमसी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि परिमंडळ १ च्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत ३० अधिकारी आणि १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तपासणी पूर्ण झाल्यावर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला माथाडी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी परदेशातून आयात होणाऱ्या फळांमधून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे विशेष समिती नेमण्याची मागणी केली होती. त्यांच्या या आरोपानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली आहे.
तपास मोहिमेदरम्यान पोलिसांनी एपीएमसी फळ बाजारातील आठही शीतगृहे, गोदामे आणि आजूबाजूच्या वस्त्यांची कसून तपासणी केली. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, बाजारात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी किंवा इतर परदेशी घुसखोरांचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ताब्यात घेतलेल्या १५० संशयितांच्या नागरिकत्वाच्या पुराव्यांची पडताळणी केली जात आहे आणि त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी बाजारातील सर्व घटकांना आवाहन केले की, कोणालाही कोणत्याही परदेशी नागरिकाबद्दल संशय वाटल्यास, त्यांनी त्वरित एपीएमसी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल
एपीएमसी फळ बाजार हे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एक प्रमुख व्यापार केंद्र आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने कामगार, व्यापारी आणि वाहनचालकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अशा ठिकाणी गैरव्यवहार रोखण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे केल्या जातील, असे नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.