नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) काही महत्त्वाच्या बाजारपेठांतील इमारतींना नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा ‘अति धोकादायक’ असा शिक्का मारला आहे. यामध्ये कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केटमधील मध्यवर्ती इमारत, मॅफ्को मार्केट आणि फळ बाजारातील सेंट्रल फॅसिलिटी इमारतीचा समावेश आहे. यामुळे या इमारतीत दररोज काम करणाऱ्या व्यापारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महापालिकेच्या २०२५-२६ सालच्या सर्वेक्षणात नवी मुंबईतील ५१ इमारतींना ‘सी-१’ प्रकारात – तात्काळ रिकामी करून पाडाव्या लागणाऱ्या – दर्जा देण्यात आला आहे. याच यादीत एपीएमसीतील वरील इमारती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. संबंधित इमारती वापरणे जीवितास आणि वित्तास गंभीर धोका असल्याचा इशारा पालिकेच्या नोटिसीत देण्यात आला आहे. याअंतर्गत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या डागडुजीसाठीही सूचना देण्यात आल्या आहेत.
१९७७ मध्ये उभारलेल्या या इमारतींना आता चार दशकांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या कालावधीत काही ठिकाणी छत पडण्याच्या, भिंती उखडण्याच्या घटना वारंवार घडत असून, पावसाळ्यात धोका अधिक वाढतो. रविवारी सभापतींच्या दालनाच्या मागच्या बाजूचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी आहे. गेल्या वर्षी या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता, मात्र माथाडी कामगारांच्या आंदोलनानंतर तो पूर्ववत करण्यात आला.
यंदाही डागडुजीसाठी निधी मंजूर झाल्यानंतरही कामे अपूर्ण असून, महापालिकेने पुन्हा नोटिसा पाठविल्या आहेत. व्यापाऱ्यांनी दुरुस्तीला सहमती दर्शवली असली तरी पर्यायी जागेअभावी व्यवहार थांबविणे शक्य नसल्याचे चित्र आहे. या संदर्भातील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, न्यायालयीन निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे बाजार समिती सचिवांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेकडून इमारतींसंदर्भात आलेल्या नोटीसची दखल घेत बाजार समितीच्या २३ तारखेच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले असले तरी समितीच्या मुख्य कार्यालयाचीही दुरुस्ती लवकरच करण्यात येईल. मसाला मार्केटच्या मध्यवर्ती इमारतीतील सर्व गाळा धारकांना नोटीस दिली असून, त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतर कारवाई केली जाईल. –डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी
मॅफ्को मार्केटवर कारवाई एपीएमसी परिसरातील मॅफ्को मार्केटमधील इमारत ‘अतिधोकादायक’ घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी सकाळी ११ वाजता नवी मुंबई महापालिकेने या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला. विभाग अधिकारी सागर मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, इमारत अतिधोकादायक असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच वीजपुरवठाही खंडित करण्यासाठी महावितरणकडे पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत.