नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसात वारंवार पाणी साचत असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. विशेषतः पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या की या मार्गात पाणी तुंबतेच. यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो आहे.
या भुयारी मार्गाशेजारीच ड्रेनेज लाईन असल्याने गटारे तुंबली की साचलेले सांडपाणी रस्त्यावर पसरते. त्यामुळे दुर्गंधी व घाण पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येतून आम्हाला कायमस्वरूपी सुटका कधी मिळणार, असा सवाल स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत.
या भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असल्यामुळे दररोज हजारो नोकरदार तुर्भे स्थानक मार्गे कार्यालयात ये-जा करतात. सकाळच्या वेळेस वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू असताना या भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यामुळे त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा पायांपर्यंत पाणी साचलेले असते, कधी कधी घाण पाण्यामुळे कपडे खराब होतात, तर कधी चपला वाहून जातात. त्यामुळे नोकरदार वर्ग मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जात असून रेल्वे प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.
भुयारी मार्गात पाणी साचण्याच्या या समस्येबाबत सिडको प्रशासनाला रेल्वेकडून वारंवार कळवण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी सिडकोने गटारांची स्वच्छता केली असून, पाणी निचऱ्याकरित पंपही लावण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. – अपर्णा देवधर, व्यवस्थापक, तुर्भे रेल्वे स्थानक