नवी मुंबई : प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांकडे महापालिका, पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्या्चे चित्र असून दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने वाशीतील दोन विकासकांवर केलेली दंडात्मक कारवाई म्हणजे यंत्रणांना उशिरा सुचलेले शहाणपण असल्याच्या प्रतिक्रिया रहिवाशांमधून व्यक्त होत आहेत.

नवी मुंबईत विशेषत: वाशी उपनगरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. जमिनीतील दगड फोडण्यासाठी या ठिकाणी दिवसा-रात्री केले जाणारे स्फोट, धूळ क्षमन यंत्रणांचा असलेला अभाव, मुख्य रस्त्यांवर पसरणाऱ्या चिखलाकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे आसपासच्या परिसरात राहणारे रहिवासी अक्षरश: हैराण असून यासंबंधी महापालिका तसेच पोलिसांकडे तक्रारी करूनही कुणी दाद देत नाही असे चित्र आहे.

हेही वाचा – उरण : सकाळीच जेएनपीटी वसाहतीसमोर एनएमएमटी बस नादुरुस्त, ऐनवेळी भर रस्त्यात बस बंद झाल्याने प्रवासी त्रस्त

वाशीतील सिडको इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाची कामे ठरावीक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. काही भागातील जुन्या इमारतींची तोडकामे, खोदकामे, डेब्रिज वाहतूक, भंगार विक्री अशा स्वरुपाची कामेही काही राजकीय नेत्यांनी मिळवली आहेत. या स्थानिक पुढाऱ्यांच्या देखरेखीत सुरू असलेल्या या प्रकल्पस्थळांची साधी पाहणीही प्रशासकीय यंत्रणांकडून वर्षानुवर्षे केली जात नाही असे चित्र आहे.

मुंबई, नवी मुंबईतील वायुप्रदूषणाचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने खडबडून जागे झालेल्या नवी मंबई महापालिका प्रशासनाने आठवडाभरापासून यासंबंधीचे पाहणी दौरे करून काही नोटिसा बजावल्या आहेत. असे असले तरी या नोटिसा आणि आकारण्यात येणारा दंड यामधून काही साध्य होईल का, असा सवाल त्रस्त रहिवाशांना पडला आहे.

कोट्यवधींच्या प्रकल्पांना किरकोळ दंड

नवी मुंबई महापालिकेच्या नियमावलीनुसार प्रदूषण नियंत्रण उपाय करण्यात अपयशी ठरलेल्या विकास प्रकल्पांना भूखंड आकाराच्या प्रति चौरस मीटरमागे १० रुपये अशी दंड आकारणीची तरतूद आहे. महापालिकेमार्फत वाशीतील मे. मिस्त्री डेव्हलपर्स आणि अरिहंत या विकासकास याच दराने दंडाची आकारणी केली आहे. या आकारणीनुसार मिस्त्री डेव्हलपर्स कंपनीला ५१ हजार रुपये तर अरिहंत अद्विका प्रकल्पाला एक लाख १२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शेकडो कोटी रुपयांचे हे प्रकल्प राबविणाऱ्या या बिल्डरांना आकारली जाणारी ही दंडाची रक्कम फारच किरकोळ असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

राजाश्रयामुळे सगळेच निर्ढावलेले

वाशी सेक्टर २ येथील जुन्या मेघदूत, मेघरात चित्रपटगृहांच्या ज्या भूखंडांवर उभ्या राहत असलेल्या प्रकल्पाला महापालिकेने ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे तेथील कामे मिळविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरू असलेली राजकीय अहमहमिका गमतीशीर ठरली होती. हा भूखंड मुळात मनोरंजन वापरासाठी राखीव होता. मोठ्या प्रयत्नाने या भूखंडावरील वापर बदलास बिल्डरने सिडकोकडून मंजुरी मिळवून आणली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाचे बांधकाम आराखडे मंजूर केले. या ठिकाणची कामे मिळावीत यासाठी मध्यंतरी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त संघटनेने जोरदार आंदोलन केले होते. भाजपाचे नेते दशरथ भगत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम सुरू होताच या ठिकाणी भाजपा नेते गणेश नाईक यांच्या कट्टर विरोधकांपैकी एक समजल्या जाणाऱ्या तुर्भ्यातील एका नेत्याचा वावर या ठिकाणी अचानक वाढला. हे कामही या माजी नगरसेवकाच्या कंपनीलाच मिळाल्याची चर्चा आहे. मात्र सुरुवातीला कामे मिळावीत यासाठी आग्रह धरणाऱ्या प्रकल्पग्रस्त संघटनेची भूमिका अचानक कशी मवाळ झाली याची खमंग चर्चा आता सुरू आहे.

वाशी सेक्टर ९ भागातही सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील एका नेत्याचा प्रभाव आहे. याच भागातील काँग्रेसचा एक माजी नगरसेवकही काही प्रकल्पांवर स्वत:ची मोहर उमटवून आहे. या भागात जमिनीतील दगड फोडण्यासाठी रात्री-अपरात्री स्फोट घडविले जातात. या आवाजामुळे जेएन ४ तसेच आसपास उभ्या असलेल्या वसाहतींना हादरे बसत असल्याच्या तक्रारी आहेत. येथील रहिवाशांच्या तक्रारींनंतरही याकडे प्रशासकीय यंत्रणांनी ढुंकून पाहिले नसल्याचे बोलले जाते.

हेही वाचा – नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार बंद, १०० कोटींचे व्यवहार ठप्प

प्रदूषणाचे नियम मोडणारे प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढविण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू असून यामध्ये लवकरच बदल केले जातील. याशिवाय येत्या काळात अशा आणखी काही प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत अशा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. – शिरीष आदरवाड, अतिरिक्त शहर अभियंता, नमुमपा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुमजली व्यापारी संकुले उभारत असताना धूळ आटोक्यात राहावी तसेच ध्वनिप्रदूषण टाळावे यासाठी कोणतेही प्रयत्न प्रकल्पाच्या ठिकाणी होताना दिसत नाहीत. यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. – जितेंद्र कांबळी, अध्यक्ष, वाशी सेक्टर २ रेसिडेन्स असोसिएशन