उरण : पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अति मुसळधार पावसामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती आहे. तर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेतकऱ्यांचे भात राबातील बियाणेच कुजून गेल्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. धूळपेरणीला पावसामुळे संधीच मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
या वर्षी पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात पावसाचा लहरीपणा वाढल्याने महागडी बियाणे वापरून केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे. उरणमध्ये अनेक ठिकाणी जूनच्या ५-६ तारखेपासून पेरणीला सुरुवात केली. मात्र पावसाचा वेग वाढतच राहिला. त्यामुळे भातरोपे तयार न होताच बियाणे कुजून गेले. तरीही शेतकऱ्यांनी पुन्हा एकवार दुबार भातपेरणीची तयारी केली आहे. मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे उरल्यासुरल्या भात बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने या भात बियाणाला उगवण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तालुक्याबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे.
उगवलेली रोपे कमकुवत
महागडी बियाणे खरेदी करून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, मात्र भाताची उगवण व्यवस्थित न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. या वर्षी सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असून काही ठिकाणी उगवलेली रोपे फार कमकुवत असल्याचे कृषिमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील व शेतकरी रमेश फोफेरकर यांनी सांगितले.
भाताचे लागवड क्षेत्र कमी
उरण तालुका हा एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे; परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तालुक्यातील भात लागवड क्षेत्र कमी झाले आहे. उरण तालुक्यात आजही पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. मात्र पावसामुळे हवी तशी न झाल्यामुळे भातरोपे उगवलीच नाही. धूळपेरणीला संधी न मिळाल्यामुळे जी उन्हाची ऊब महत्त्वाची आहे, ती ऊब शेतात साचलेल्या पाण्यामुळे मिळाली नाही. त्यामुळे भातरोपांची अवस्था फार बिकट आहे. महत्त्वाचे म्हणजे भात लागवडीसाठी भातरोपेच नसतील तर शेतकऱ्यांना भातशेतीची लागवड करणे अवघड होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे लागवड क्षेत्रात अधिक घट होणार आहे.