सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना सामान्य नागरिकांना भेटून लेखी व तोंडी समस्या सांगितल्या तरी वर्षभराच्या भेटीनंतर समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याचा अनुभव कामोठे येथील नागरिकांना आला आहे. शीव-पनवेल महामार्गावरील कामोठे येथील भुयारी मार्गाचे रखडलेल्या कामाचे निवेदन कफ संस्थेच्या सदस्यांनी सचिव सी. पी. जोशी यांची भेट घेत दिले होते. तरीही समस्या तशीच आहे.

कळंबोली व कामोठे वसाहतीला जोडणारा रस्ता महामार्गाच्या रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाच्या कामात बंद करावा लागला. पर्यायी रस्ता न देता येथे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गाचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाने हाती घेतले होते. मात्र समुद्रसपाटीपेक्षा रस्ता खोल असल्याने येथे अर्धवट अवस्थेत भुयारी मार्ग बांधण्यात आला. पावसाळ्यात या भुयारी मार्गात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहते व येते डासांचे प्रजनन मोठय़ा प्रमाणात होते. कामोठे येथील राजकीय व सामाजिक संस्थांनी याविषयी आवाज उठवला, मात्र त्याचा लाभ अद्याप होऊ  शकला नाही.

कामोठे येथील सिटीझन युनिटी फोरमच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांच्याकडे याविषयी सनदशीर मार्गाने दाद मागितली. त्याचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मागील वर्षी या विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्याकडे लेखी निवेदन दिले. त्यावेळी सचिव जोशी यांच्याकडून ‘कफ’च्या सदस्यांना पावसाळ्यापूर्वी या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याच्यावर कार्यवाई झालेली नाही.  महामार्गालगत पावसाळी नाल्याच्या कामाला गती न मिळाल्याने यंदाही कामोठे व कळंबोली दरम्यान पावसाळी पाणी साचणार हे निश्चित आहे.

आरोग्याचा प्रश्न

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘कफ’च्या सदस्यांनी आम्ही सचिव जोशीसाहेबांची भेट घेतली होती. मात्र त्यांच्या आश्वासनानंतरही कामे होऊ  शकली नाही हे सत्य आहे. कामोठे भुयारी मार्गाचे रखडलेले काम हे त्यापैकी एक आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ  शकेल.

सार्वजनिक बांधकाम विभाग भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याविषयी गंभीर आहे. हे पाणी येथे साचू नये यासाठी तज्ज्ञ कंत्राटदार कंपनीच्या शोधात आहे. नागरिकांना या भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्यामुळे त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.    – किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.