अंबरनाथः काटई कर्जत राज्यमार्गावरून खोणी नाका ते तळोजा औद्योगिक वसाहत हा प्रवास येत्या काही दिवसांत वेगवान होणार आहे. काटई नाका ते तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रस्त्याच्या कामाची देखरेख करण्याठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली असून, लवकरच या कामाला सुरुवात होण्याची आशा आहे.

काटई ते नेवाळी नाका या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर विना अडथळा आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर खोणी नाक्यापासून तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावर पूर्वी औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यात पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचण्यासाठी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या भागांतून प्रवासी या रस्त्याचा वापर करत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. त्यातील एका टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. आता याच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए प्रशासनाने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत. रस्ते कामावर देखरेख करण्यासाठी या सल्लागाराची मदत होणार आहे. या कामाचे मुल्य २१२ कोटी ७५ लाख रुपये इतके आहे. त्यामुळे, लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होण्याची आशा आहे.

हेही वाचा – ठाणे : काळू धरण नकोच, फसवणुकीच्या भावनेतून धरण क्षेत्रातील ग्रामस्थांचा मुरबाडमध्ये मोर्चा

हेही वाचा – ठाणे : डोंबिवलीत ६५ बेकायदा बांधकामे, पालिकेचा ‘ईडी’ला पाठवायचा अहवाल सज्ज

फायदा कसा होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोणी ते तळोजा औद्योगिक वसाहत या मार्गाच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. याच मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षांत शेकडो नवी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यावर औद्योगिक वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होते. या रुंदीकरणामुळे प्रशस्त मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तळोजा, पनवेल, खारघर, नवी मुंबई आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर जाने सोपे होणार आहे. याच मार्गावर उसाटणेपासून नवा पर्यायी मार्ग उभारला जात आहे जो थेट जुन्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. तर, याच भागातून मेट्रो १२ प्रस्तावित असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरून वाहतूक करणे सोपे होणार आहे.