नवी मुंबई – सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला लवकरच दिलासा मिळणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलाचे उद्घाटन ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या नव्या पुलाच्या वापरामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. उद्घाटनानंतर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

सध्या वाशी खाडी पुलावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी ही मुंबई आणि नवी मुंबईमधील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या कार्यालयीन गर्दीत या मार्गावर वेळेचा मोठा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाशी खाडीत दोन नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.

या प्रकल्पात मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पहिला पूल ऑक्टोबर २०२४ मध्येच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा दुसरा पूलही पूर्ण झाला आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • दोन्ही पूल मिळून सुमारे दोन किलोमीटर (१८३७ मीटर) लांबीचे असून, तर मुंबईकडील पोहोच मार्गाची लांबी ३८० मीटर आहे
  • प्रत्येक पुलावर तीन मार्गिका (लेन) आहेत, त्यामुळे वाशी पुलावर एकूण सहा मार्गिकांचा विस्तार झाला आहे.
  • या प्रकल्पासाठी एकूण खर्च ५५९ कोटी रुपये इतका आला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या पुलाची उभारणी केली आहे.
  • वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवासाची वेळ वाचवणे हे या पुलाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

नागरिकांना दिलासा

नवीन पुलामुळे दररोज वाशी ते मानखुर्द दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. वेळेची बचत होईलच, पण इंधनाचाही खर्च कमी होईल. तसेच पर्यावरणीय दृष्टीनेही ही सुविधा सकारात्मक ठरणार आहे. पुलाचे उद्घाटन होताच, पुढील दिवसापासून नागरिकांना या पुलाचा वापर करता येणार असून, सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पामुळे केवळ मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील दळणवळणच नव्हे, तर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.