उरण : उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. उरण ते बेलापूर/नेरुळ मार्गावरील लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्याची तसेच लोकलच्या प्रवाशांच्या इतर समस्या सोडविण्याची मागणी बालदी यांनी केली. या बैठकीत वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेत येत्या काळात या मार्गावर दहा फेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान उरण ते बेलापूर/नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर, सोयीस्कर आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या बैठकीत रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच तसेच या मार्गावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. स्थानकांतील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत.