पनवेल : पावसाळा संपला असला तरी पनवेल मुंब्रा महामार्गावरील कळंबोली लोखंडबाजाराच्या प्रवेशव्दारावर गेले काही दिवस रस्त्यावर पाणी तुंबले असून शेकडो वाहने यातून ये-जा करत आहेत. महामार्गालगत असणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलवाहिनीतून अर्धा किलोमीटर अंतरावरून हे पिण्याचे पाणी रस्त्यावर येत असून गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय सूरु आहे. अवजड वाहन चालक येथे असून या जलवाहिनीतून निघणा-या पाण्याचा वापर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी करत आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

कामोठे, तळोजा व खारघर या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना सातत्याने नागरीकांना करावा लागत आहे. गेली काही वर्षे जानेवारीपासून पनवेल महापालिका पाण्याच्या नियोजनासाठी पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी कपात जाहीर करत आली आहे. असं असतांना जलवाहिनीतील गळती गेले काही दिवस सुरुच असल्याच चित्र आहे.

हेही वाचा… उरण : अंगाची काहिली शमविणारे ताडगोळे बाजारात

पावसाळ्यात लोखंड पोलाद बाजाराच्या प्रवेशव्दारावर पाणी रस्त्यावर येते त्याला जास्तीचा पाऊस हे कारण अधिका-यांकडून दिले जात होते. मात्र सध्या पाऊस नसला तरी लोखंड पोलाद बाजाराच्या प्रवेशव्दारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांनी व व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी अनेक तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न सुटत नाही. एमजेपीचे अधिकारी या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून व प्रवाशांकडून होत आहे. एमजेपीची जलवाहिनी ही जिर्ण अवस्थेत असल्याने या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र अनेकदा एकाच जलवाहिनीवर दुरुस्ती करणे हा पर्याय नसल्याने ही समस्या कायमची सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा… खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर; आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत एमजेपीचे कार्यकारी अभियंता विजय सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी येत्या आठवड्यात नवीन जलवाहिनी याठिकाणी टाकणार असल्याचे सांगीतले. यापूर्वीही पाणी पुरवठा थांबवून जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम हाती घेतले. मात्र तरीही गळती थांबली नसल्याने नवीन जलवाहिनी टाकणार असल्याची माहिती एमजेपीचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांनी दिली.