डोंगर कपारींमध्ये, गुहांमध्ये राहणारा आदिमानव पुढे सपाटीवर घरांमध्ये राहू लागला, टोळ्या करून समूहाने राहू लागला. टोळ्यांचे रूपांतर लहान लहान पाडय़ांमध्ये झाले. पाडय़ांची लहान खेडी बनायला फार काळ लागला नाही. खेडय़ांची टुमदार गावे, गावांची शहरे होता होता कारखानदारी, व्यापार उदीम वाढत जाऊन त्यातील काही बृहन् शहरे (मेट्रोपॉलिटन सिटीज) बनली. एका छोटय़ा बीजातून झुडपाचा जन्म होतो, झुडपाचा वृक्ष आणि पुढे त्याचे रूपांतर प्रचंड मोठय़ा वटवृक्षात होते. त्याप्रमाणे सध्याची बृहन् शहरे मोठय़ा दिमाखात उभी आहेत! पुढे येणाऱ्या असंख्य पारंब्यांनी तो वटवृक्ष कुटुंबवत्सल होतो, त्या पारंब्यांचीही स्वतंत्र झाडे तयार होतात. या वटवृक्षाप्रमाणेच आजच्या शहरांचं झालंय. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास वगरे शहरांच्या पारंब्या म्हणजेच उपनगरे अशी काही फोफावलीत की त्यांना स्वतंत्र शहरेच म्हणता येईल! हळूहळू या बृहन शहरांचा असा काही विकास झाला की आसपासच्या क्षेत्रातल्या सर्व गावांचे, उपशहरांचे राजकीय, सामाजिक निर्णय या बृहन् शहरांमधूनच घेतले जाऊ लागले. ही बृहन् शहरे म्हणजेच त्यांचे प्रांत असे स्वरूप आले. आपल्याकडच्या बऱ्याच लोकांना पश्चिम बंगाल राज्यातल्या कोलकात्या शिवाय दुसरे गाव माहिती नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना पॅरिस शिवाय फ्रान्सचे दुसरे शहर माहिती नाही. या मोठय़ा शहरांचे इतिहास, सध्याची त्यांची उन्नत अवस्था हे त्यांच्या प्रांताचे किंवा देशांचे प्रतिनिधित्व करतात. जगातील अशाच काही शहरांचा उदय, त्यांच्यात झालेले बदल, आणि त्यांचे इतिहास आणि सध्याची त्यांची स्थिती याविषयी शोध घेण्याचा प्रयत्न या सदरातून केला जाणार आहे. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com वर्ष ११ वे, वनस्पतींचे.. ‘लोकसत्ता’मध्ये मराठी विज्ञान परिषद चालवीत असलेल्या कुतूहल सदराने आज अकराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. याचे श्रेय ‘लोकसत्ता’च्या संपादक मंडळाला आणि तमाम वाचकांना आहे. याला विविध प्रकारे भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागांतील काही शाळांत प्रार्थना झाल्यावर मग या सदराचे सार्वजनिक वाचन होते. काही शाळा हे सदर आपल्या सूचना फलकावर लावतात. काही शाळांतील मुलांना हे सदर चिकटवहीत लावण्यासाठी शिक्षक आणि पालक उद्युक्त करतात. या सदरातून मिळणारी माहिती सर्वच वाचतात. पहिल्याच वर्षी वैज्ञानिक संकल्पनांवर दिलेली माहिती राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक कृ. पां. मेढेकर यांना नवीन वाटल्याचे त्यांनी पत्र लिहून कळवले होते. वस्तुत: मेढेकर हे १९४८ सालचे मुंबईच्या प्रख्यात इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून उत्तम गुण मिळवून एम.एस्सी. झालेले होते. २-३ वर्षांपूर्वी परिषदेने रसायनशास्त्रावर चालविलेल्या काही लेखांबाबत आयआयटी मुंबईतील प्रा.शाम असोलेकर म्हणाले होते की या लेखांचा उपयोग मी पीएच.डी.च्या मुलांना मार्गदर्शन करताना करतो. ‘लोकसत्ता’च्या वाचकांच्या पत्रव्यवहारातून सदराच्या विषय निवडीसाठी अथवा लेखातील तपशिलाच्या अचूकतेबद्दल सूचना आल्या नाहीत. हे सदर चालवीत असताना त्या त्या क्षेत्रातले शिक्षक, प्राध्यापक, संशोधक आणि प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना परिषदेने लिहिते केले. त्यातील काही लोक प्रथम लिहिणारे होते. पण दर वर्षी अशा सदरांसाठी २५ ते ३० लेखकांचा एक गट तयार होत गेला. गेल्या १० वर्षांतील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विषयांच्या सदरांची पुस्तके तयार झाली. परिषदेकडे दरवर्षीची पुस्तके छापण्याएवढे आíथक बळ नसल्याने कोणी प्रकाशक पुढे आले तरच ते जमते. यंदा २०१६ साली ‘वनस्पती’ हा विषय निवडला आहे. आम्हाला वर्षभरात २६० लेख छापता येतात. सध्याच आमच्याकडे ५०० वनस्पतींची यादी जमली आहे. त्यातून आम्ही २५० वनस्पती निवडणार आहोत. त्यात भाजीच्या, फळांच्या, धान्याच्या, कडधान्याच्या, औषधांच्या, फुलांच्या अशा अनेक वनस्पतींचा समावेश आहे. प्रत्येक लेख छापायला जाण्यापूर्वी इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील वनस्पतिशास्त्राचे दोन निवृत्त प्राध्यापक प्रा. शरद चाफेकर आणि प्रा. चंद्रकांत लट्टू यांच्या नजरेखालून जातील. ही प्रथा पूर्वीच्या सर्व वर्षी वापरली गेली होती. तेव्हा वाचकहो, उद्यापासून वर्षभर आपल्याला वनस्पतींची माहिती मिळत राहील. - अ. पां. देशपांडे, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org