ज्या घरात लहान मुलं आहेत, त्या घरांच्या भिंती ‘सुंदर रेघोटय़ां’नी भरून गेलेल्या असतात. या रेघोटय़ा म्हणजे मुलांच्या भावनांची, विचारांची अभिव्यक्ती असते. हातात पेन, पेन्सिल, खडू घेऊन भिंतीवर रेघोटय़ा ओढणं इथून चित्र काढायला सुरुवात होते. कागदावर गिरगिटणं सुरू होतं. हातात पेन्सिल कशी धरायची हे माहीत नसतं, पण चित्र काढण्याची मनापासून इच्छा मात्र असते. मोठय़ा माणसांसारखं हातात पेन घेऊन कागदावर काहीतरी करणं हे तर अतिशय आवडतं.
रेघोटय़ा चितारल्यामुळे त्यांच्यातली कल्पनाशक्ती विकसित व्हायला नक्कीच मदत होते. अनेक मुलांना हा फायदा मिळत नाही. निम्न आर्थिक गटातल्या पालकांना याची फारशी जाणीव नसते. त्यांना चित्रकलेचे अनुभव मुख्यत: शाळांतूनच मिळतात. मात्र यात मुलांची पहिली महत्त्वाची र्वष निघून जातात. बालवाडीत तरी असे अनुभव मुलांना मिळायला हवेत. मुक्तपणे कागदावर काहीही रेखाटणं हे व्हायला हवं.
पुढे चित्रकला हा विषय म्हणून सुरू होतो. मात्र या आधीच मुलांना मोकळेपणी आणि हवी तशी चित्रं काढायला मिळायला हवीत. शाळेत वेळापत्रकातला आठवडय़ातून एखादा तास या विषयाला मिळतो. त्या तासाला शिक्षकांनी दिलेल्या विषयावर चित्र काढण्याचं काम मुलं करतात. शाळेत चित्रकला ‘शिकवली जाते’, इथे विषयानुसार चित्र काढणं आवश्यक असतं. अनेकदा तर रंगसंगती काय करायची हेही शिक्षकच सांगतात. चित्रांवर गुण दिले किंवा शेरे दिले जातात. कोणाचं चित्र चांगलं, कोणाचं वाईट अशा गोष्टी सुरू होतात. ज्यांना चांगले शेरे मिळत नाहीत, त्यांची चित्रकला चांगली नाही असा इतरांचा आणि खुद्द त्याचा/तिचाही समज होतो. नुकतीच कुठे फुलू लागलेली चित्रकला मागे पडत जाऊन हळूहळू संपण्याची दाट शक्यता असते. अभ्यासात कुठे कमतरता निर्माण झाली तर अजिबात खपवून न घेणारे पालक, शिक्षक कोणाची चित्रकला बंद पडली म्हणून त्यामागची कारणं शोधायला जात नाहीत.आता तर शाळांमधून कला, क्रीडा संपण्याच्या मार्गावर आहे, ते वेगळंच. चित्रं हा खरं तर दृश्य- अवकाशीय बुद्धिमत्तेचा भाग आहे. याला प्रोत्साहन दिलं तर त्यातून उद्याचे चित्र-शिल्पकार, अभियंते, आíकटेक्ट घडणार आहेत. या दृष्टीने या बुद्धिमत्तेकडे बघायला हवं आहे.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com