सर्व प्रकारच्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मुबलक संख्येने लोहित रक्तकणिका असतात. फुप्फुसातील वायुकोषातील ऑक्सिजन, शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अविरतपणे या पेशी करत असतात. जलीय प्राण्यांमध्येदेखील याच रक्तपेशी कल्ल्यांद्वारे शोषलेला ऑक्सिजन शरीरभर खेळवतात.
मानवी लोहित रक्तकणिका आकाराने साधारणपणे ६.२ ते ८.२ ४ इतक्या व्यासाच्या असतात. (४ म्हणजे मायक्रोमीटर. १ मायक्रोमीटर = १०-६ मीटर.) लोहित रक्तकणिकांचा कडेचा घेर २ ते २.५ ४ इतका, तर मध्यभाग ०.८ ते १ ४ इतका असतो.
लोहित रक्तकणिकेच्या आत हिमोग्लोबिन असल्याने त्यांचा रंग लाल असतो. प्रत्येक लोहित रक्तकणिकेमध्ये हिमोग्लोबिनचे २७० दशलक्ष जैवरेणू असतात. सस्तन प्राण्यांत लोहित रक्तकणिका केंद्रकविहीन असते. रक्तपेशी तयार होत असताना हे केंद्रक असते; परंतु रक्तपेशीच्या वाढीच्या पुढील अवस्थेत ते नाहीसे होते. तांबडय़ा रक्तपेशीत जास्तीतजास्त हिमोग्लोबिन राहावे, यासाठी ही तजवीज होते.
लोहित रक्तकणिका अस्थिमगजात तयार होतात आणि त्या साधारणपणे १२० दिवस आपले कार्य करत असतात. त्यांचा नाश यकृतात किंवा प्लीहेत होतो.
स्त्रियांमध्ये प्रत्येक घन मिलीमीटर रक्ताच्या थेंबात ४ ते ५ दशलक्ष लोहित रक्तकणिका असतात, तर पुरुषांमध्ये हीच संख्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये ५ ते ६ दशलक्ष इतकी असते. स्त्रीच्या शरीरात या रक्तपेशींची संख्या कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे नियमितपणे होणारा मासिक स्राव! तसेच कुपोषण, बाळंतपण हीदेखील कारणे आहेत. पुरुषांमध्ये असणाऱ्या संप्रेरकामुळे हेच प्रमाण अधिक असते. उंचावर आणि थंड हवेच्या ठिकाणावर राहणाऱ्या लोकांच्या शरीरात लोहित रक्तपेशींचे प्रमाण जास्त असते. येथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने झालेले हे अनुकूलन आहे.
पंडुरोगाच्या लक्षणात लोहित रक्तकणिका, हिमोग्लोबिन आणि हिमाटोक्रीटचे प्रमाण ही तिन्ही परिमाणे कमी झालेली असतात. पंडुरोगामुळे थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, धाप लागणे अशा समस्या दिसून येतात. तांबडय़ा रक्तपेशी साधारण प्रमाणापेक्षा जास्त वाढल्या असतील, तर तोही काही रोगांचा इशारा असतो.
–डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
‘दिनकर’ यांची साहित्यसंपदा
‘दिनकर’ हे भारतीय संस्कृतीच्या समृद्धीने भारलेले कवी होते. त्यामुळेच या संस्कृतीची जपणूक करणारी, पराक्रमाला प्रेरणा देणारी, वर्तमानकाळातील निराशेत आशेचा प्रकाश दाखविणारी, विराट स्वप्ने पाहण्याची आकांक्षा निर्माण करणारी, अशी त्यांची कविता आहे. म्हणूनच ‘हुंकार’मध्ये ते म्हणतात-
‘अमृत-गीत तुम रचो कलानिधी
बुनो कल्पना की जाति।
तिमिर-ज्योतिकी, समर भूमि-का
मैं चारण मैं वैतारली।’
‘दिनकर’ हे सामान्यत: प्रवाही, प्रासादपूर्ण शैलीत लिहिलेल्या राष्ट्र कवितेसाठी प्रसिद्ध आहेत. साधारणत: त्यांची कविता तीन प्रकारची जाणवते. एक म्हणजे राष्ट्रभावनेने भारावलेले काव्य. देशभक्तीपर कवितेने दिनकरांना लोकप्रियता मिळवून दिली. बारडोली सत्याग्रहाने प्रेरित होऊन त्यांनी १०-१२ गीते लिहिली व त्याचे संकलन ‘बारदोस्त विजय’ (१९२८) या नावाने प्रकाशित झाले. पण खऱ्या अर्थाने देशभक्तीपर काव्याचा सामथ्र्यशाली आविष्कार प्रथम आला तो ‘रेणुका’ (१९३५) मधील काही कवितांमध्ये. छायावादाला मागे सारत त्यांचा ‘रेणुका’ संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या या नवेपणामुळे, नवी शैली, भाषा यामुळे सगळं वातावरणच भारून टाकलं. साहित्य जगतात उत्साहाची लाटच आली.
त्यानंतर १९३८ मधील ‘हुंकार’, ‘सामधेनी’ (१९४७) आणि ‘परशुराम की प्रतीक्षा’ (१९६३) मधील सर्वच कविता देशभक्तीपर आहेत.
‘हिमालय’ या १९३३ मध्ये लिहिलेल्या कवितेमुळे दिनकरजींना खूप प्रसिद्धी मिळाली. या काळात स्वातंत्र्याचं आंदोलन घराघरांत पोहचलं होतं. दिनकरजींच्या या कवितेतील ओळीओळींना जनता दाद देत होती. या कवितेसाठी दोन-तीन वेळा त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आलं.
दिनकरांची प्रेमकविताही लक्षणीय आहे. त्यांचा खरा आत्मा रमला तो ‘रसवन्ती’मधील शृंगारिक काव्यात. दिनकरांची प्रेमकविता वाचताना, सूक्ष्म, विविधापूर्ण गहिरे अनुभव प्रतीत होत नाहीत, पण भाषा अतिशय मृदू, प्रासादिक आहे. १९५५ मध्ये त्यांच्या ‘नीलकुसूम-’ या काव्याने एक नवीन वळण घेतले. तोपर्यंत त्यांचे काव्य आवेशपूर्ण होते. कदाचित विश्वातील समकालीन काव्याच्या अभ्यासाचा हा परिणाम असावा.
मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com