पालघर : खरीप २०२४ च्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पालघर जिल्ह्यातील १९२५ शेतकऱ्यांनी केलेल्या ३८३३ अर्जांवर पिक विमा पुरवणाऱ्या कंपनीने २३.५३ कोटी रुपयांचा मोबदला दिला गेला असला तरी पालघर तालुक्यातील माहीम, पालघर व सफाळे मंडळ क्षेत्रातील ५० शेतकरी पूर्ण विमा संरक्षणापासून वंचित राहिले आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत प्रमाणकांचे (ट्रिगर) पूर्ण झाल्यास संबंधित शेतकऱ्याला हेक्टरी ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण रक्कम देण्यात येते. मात्र जिल्ह्यातील माहीम, पालघर व सफाळे व्यतिरिक्त इतर सर्व मंडळांमधील बागायतदारांना विम्याची पूर्ण मिळाली असताना या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा कवचाची अवघे ४५ टक्के रक्कम मिळाली आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी विमा कवच पुरवणाऱ्या बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा केली असता महावेध या वातावरणातील घटकांच्या नोंद करणाऱ्या शासकीय संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार प्रमाणाचे निश्चित करून नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्यमान व आर्द्रता समान असताना यातील मंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय दिल्याने आपल्यावर दुहेरी संकट उडवल्याची किफायत लोकप्रतिनिधींकडे मांडली आहे.

यासंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी समन्वय साधून या प्रश्नावर मार्ग काढावा असे मंत्री महोदयांनी सुचित केले आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता महावेध कडून प्राप्त झालेल्या पर्यावरणीय माहिती व प्रमाणके यांचा अभ्यास करून या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन मंडळांसाठी हवामान केंद्रांची आवश्यकता

जिल्ह्यात असणाऱ्या पूर्वीच्या २९ महसूल मंडळाच्या ठिकाणी स्कायमेट या कंपनीचे स्वयंचलित हवामान केंद्र अर्थात ऑटोमेटेड वेदर स्टेशन कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात नवीन १६ मंडळ क्षेत्र निर्माण झाली असून अशा ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी आजवर झाली नसल्याने अशा ठिकाणी पूर्वीच्या मंडळाची संलग्न भागातील संकलित हवामान विषयक माहितीचा आधार घेण्यात येतो. याचा फटका पालघर, माहीम व सफाळे येथील शेतकऱ्यांना झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. नव्याने निर्माण झालेल्या मंडळ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची मागणी जिल्हा कृषी विभागाने महावेध कडे केल्याचे सांगण्यात आले.