करदात्यांच्या पैशाचा अपव्यव केल्याचा आरोप पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून काही अंतरावर निर्जन वस्ती असणाऱ्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा गटार उभारणी करून लाखो रुपयांचा अपव्यय केल्याची तक्रार दांडी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. या ठिकाणी बांधकाम हाती घेतल्याने करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप होत आहेत. तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून काही अंतरावर बारा हजारी पोलीस चौकीपासून दांडी गावच्या दिशेने रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटचे गटर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून या ठिकाणी लोकवस्ती नसल्याने सिमेंट काँक्रीटची गटारे बांधण्याची आवश्यकता नसल्याचे दांडी येथील ग्रामस्थ कुंदन दवणे व इतरांनी आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या काँक्रीट गटाराच्या उभारणीदरम्यान कामांमध्ये स्टील सळया टाकण्यात येत नसल्याचे तसेच बांधकामाचा दर्जा सुमार असल्याच्याही तक्रारी होत आहेत. या मार्गावर दांडी उच्छेळी व उनभाट येथील नागरिक प्रवास करीत असून अणु ऊर्जा केंद्रातील वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत नसल्याचे तसेच हा मार्ग अणुऊर्जा केंद्राच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाविष्ट नसल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुमारे सव्वा दोन किलोमीटर लांबीच्या अंतरावर साडेपाच मीटर धावपट्टी ७.७० मीटर रुंदीकरण करण्याचे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी ९०० मिलिमीटर व्यासाचे पाइप टाकणे, मोरी बांधणे व सिमेंट काँक्रीटचे गटार ३३५ मीटर लांबीचे गटार दोन्ही बाजूस बांधण्याचे काम प्रस्तावित असून दोन कोटी रुपयांच्या या कामाला नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात या ठिकाणी काळय़ा मातीमुळे गटार बांधकाम झाल्यास मातीचा भाग वारंवार कोसळत असल्याने प्रतिबंधित होईल आणि गटाराने पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. तसेच रस्त्याचे संरक्षण होण्यास मदत होईल म्हणून ही कामे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्थापित केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कळविण्यात आले आहे.