कासा : पश्चिम बंगाल येथून डहाणू शहरातील लोणीपाडा येथे आईवडिलांकडे आलेल्या पूनम शहा हिने चौथे अपत्य मुलगी झाल्याने तिचे नाकतोंड दाबून जीव घेतला. हा प्रकार डहाणू उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री घडला. याबाबत डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल येथे राहणारी पूनम शहा ही महिला गेल्या काही दिवसांपूर्वी डहाणू लोणी पाडा येथे राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी प्रसुतीसाठी आली होती. या महिलेची मागील आठवड्यात लोणीपाडा येथे सुरक्षितरित्या गृह प्रसूती झाली होती. त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अगोदर तिला तीन मुली असल्याने चौथे अपत्य पुन्हा मुलगी झाली या नैराश्यतेतून तिने २६ एप्रिल च्या मध्यरात्री बाळाच्या नाकातोंडावर हाताचा पंजा ठेऊन जीव घेतला. या घटनेत बाळाचा गुदमरून मृत्यू झाला, त्याबाबत डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नैराश्यपोटी हे पाऊल उचलण्याची माहिती तिने पोलिस चौकशीत दिली.

पुनम शहा हिचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून तिचे सासर पश्चिम बंगाल येथील तर माहेर उत्तर प्रदेश येथील आहे. परंतु अनेक वर्षांपासून तिचे आई-वडिल डहाणू शहरातील लोणीपाडा येथे राहत असल्याने ती येथे प्रसुती साठी आली होती. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी (परीक्षा विधी) भागीरथी पवार या प्रकरणाबाबत अधिक तपास करीत आहेत.

भ्रूणहत्येला काही प्रमाणात आळा

पूर्वी अनेक रुग्णालयांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या महिन्यात गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाची लिंग तपासणी करण्यात येत असे. याकरिता अनेक रुग्णालयांमध्ये अतिरिक्त शुल्क देखील आकारले जात असे. मात्र शासनाने यावर कडेकोट बंदी आणल्यामुळे असे प्रकार आता घडत नसल्याचे दिसून येत आहे. तरीही काही रुग्णालयांमध्ये छुप्या पद्धतीने असे प्रकार घडत असतात. लिंग तपासणी थांबल्यामुळे भ्रूण हत्या नाहीत. मात्र अशावेळी बाळ जन्म झाल्यानंतर मुलगी अपत्य झाल्यास हत्या करण्याच्या घटना अजूनही घडतच आहेत.

नवजात बाळाला झुडपात पाण्यात फेकण्याच्या घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर जिल्ह्यात अनेक वेळा जन्मलेल्या काही तासाच्या व काही दिवसाच्या मुलगी असलेल्या अर्भकाला पाण्यात, कचऱ्यात किंवा झाडाझुडपांमध्ये जंगलात सोडून देण्याच्या घटना घडलेले आहेत. नवजात बाळाला मारून टाकण्याची घटना डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत अद्याप घडली नसून मागील दोन तीन वर्षात तीन मुली अर्भकाला झाडाझुडपांमध्ये व पाण्यात फेकून देण्याच्या घटना डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले आहेत.