पालघर :गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये सुरक्षांची भावना निर्माण होण्यासाठी पालघर पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट अभियानात १४ विविध गुन्हे दाखल करण्यात आले. या अभियानादरम्यान १४९ वाहन चालकांवर व १२२ गुन्हेगारांची तपासणी करून जवळपास ५५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये महत्त्वाच्या २५ ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करून ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या एकूण २० वस्त्यांमध्ये एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशनही करण्यात आले. तसेच अवैध धंद्यावर कारवाई करून दारूबंदी कायद्याप्रमाणे ११ गुन्हे दाखल करून ६५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुटखा प्रतिबंध कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करून ५५ लाख २३ हजार ५८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १२२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२९ प्रमाणे एक व कलम १२८ प्रमाणे १० आणि कलम १२६ प्रमाणे ३८ असे एकूण ५० व्यक्तीवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव त्यावेळी सादर करण्यात आले. पोलीस ठाणे अभिलेखावरील २६ वॉरंट व ४८ समन्स बजावणी करण्यात आली.
मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता कलम २८५ प्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच १२९ वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करून त्यांच्याकडून ५४ हजार ३०० रुपयांचा दंड करण्यात आला. या अभियानात ६५ पोलीस अधिकाऱ्यांसह २६६ पोलीस अंमलदार दुपारी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या अभियानात सहभागी होते.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी नव्यानेच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई करून त्याचे समूळ उच्चाटन करावे अशा सूचनाही त्यांनी अधिकारी वर्गास दिल्या आहेत.