बोईसर : अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेल्वे मार्गात येणाऱ्या गुरांना रेल्वे प्रशासनाने ग्रामपंचायतींना जबाबदार धरले आहे. ही गुरे रोखण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत. अहमदाबाद-मुंबई दरम्यान ३० सप्टेंबरपासून सुरू झालेली वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र सुरुवातीपासूनच या रेल्वेला अपघातांचे ग्रहण लागले आहे. रेल्वे धावत असताना आत्तापर्यंत गुजरात राज्यात रेल्वेच्या मार्गात अचानक शेतकऱ्यांची गुरे आल्याने रेल्वेला तीन वेळा अपघात झाले आहेत. या अपघातात सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसली तरी रेल्वेच्या पुढील भागाचे मात्र नुकसान झाले होते. अशा अपघातांमुळे वेळेचा खोळंबा होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अपघातांची पश्चिम रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असे अपघात टाळण्यासाठी गुजरातमधील अहमदाबादपासून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमधून रेल्वेमार्ग जात आहे. त्या सर्व ग्रामपंचायतींना रेल्वे सुरक्षा दलाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीची गुरे यांना रेल्वे रुळालगत येण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यानंतरही निष्काळजी झाल्यास आणि अपघात घडल्यास गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे.