पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वीटभट्टी, मिठागर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या सरी पुढील पंधरवड्यात कमी अधिक प्रमाणात सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांवर अवकाळी पावसामुळे नव्याने संकट ओढवले आहे.

६ मे रोजी सायंकाळी जिल्ह्याच्या उत्तरेच्या बाजूने म्हणजेच डहाणू तालुक्याच्या किनाऱ्यावर वादळी वाऱ्याने शिरकाव केला. या वाऱ्याची गती ताशी ५०- ६० किलोमीटर असल्याने धाकटी डहाणू बंदरात नांगरून ठेवलेल्या मासेमारी बोटीचे दोर तुटून या बोटी ७० ते १०० मीटर पुढे फरफटत गेल्या. यापैकी किमान ५० बोटींचे एकमेकांवर आदळून वा किनाऱ्यावरील खडकाला आपटून अतोनात नुकसान झाले असून मच्छीमारांकडे विद्यमान मासेमारी हंगामात उपलब्ध असणाऱ्या शेवटच्या तीन आठवडे या बोटी दुरुस्तीसाठी बंद ठेवाव्या लागणार आहेत. याशिवाय किनारपट्टीवर सुकत ठेवलेल्या मासळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनाऱ्याच्या भागात कुजणाऱ्या मासळीमुळे परिसरात दुर्गंधीसह आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार, अवकाळी पाऊस व इतर काही कारणांमुळे चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. उन्हाळ्यामध्ये चिकूला बहर येईल व उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल ही आशा असताना वादळी वाऱ्यामुळे चिकूची फळ गळती मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. घोलवड, बोर्डी परिसरात लिचीची लागवड असून हे फळ देखील उन्हाळ्यात उपलब्ध होते. या वार्षिक उत्पन्न देणाऱ्या फळाला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र आंबा लागवड मोठ्या प्रमाणात होत असून या भागातील आंबा मे महिन्याच्या मध्यापासून उपलब्ध होऊ लागतो. तयार होऊ पाहणाऱ्या आंबा फळाला या वादळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला असून वाऱ्यामुळे आंबा खाली जमिनीवर आदळून फळ फुटण्याचे प्रकार घडले आहेत. अशा फुटलेल्या फळांना व कच्च्या फळांना बाजार भाव नसल्याने बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. स्थानिक आंब्याची आवक कमी होणार असल्याने बाजारपेठेत आंब्याचे दर वाढणार असून त्याची झळ सामान्य नागरिकांना बसेल अशी स्थिती आहे.

भौगोलिक मानांकन मिळालेले बहाडोलीचे जांभूळ मे महिन्याच्या मध्यावर उपलब्ध होत असून या एका गावातून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. मात्र पावसाने या नाजूक असणाऱ्या फळाची दैना केली असून जांभळाच्या उत्पादनाला अवकाळी पावसाची झळ बसणार आहे. जांभूळच्या सोबतीने स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होणारे सफेद व लाल जांभ फळांची गळ झाली असून या अवकाळी पावसाने बागातदारांची कंबर मोडली आहे.

वाडा, विक्रमगड, पालघर, वसई तालुक्यात उन्हाळी भात लागवड केली जाते. या भाताची कापणी बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली होती तर उर्वरित ठिकाणी भात शेतामध्ये उभे होते. अशा परिस्थितीत वादळीवारा व मुसळधार पावसामुळे या पिकाची दैना झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा नुकसालीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे अवकाळी पावसामुळे शेत जमिनीमध्ये तण पुन्हा वाढणार असून खरीप हंगामापूर्वी जमिनीची उखरणी, राब करणे इत्यादी प्रक्रियांना विलंब होणार आहे.

वीट भट्टीचा हंगाम सध्या जोरात सुरू असताना माती पासून पाडलेल्या काळ्या मातीच्या विटांचे पावसाने चिखलामध्ये रूपांतर केले. याकामी मातीचा पुनर्वापर करणे काही अंशी शक्य असले तरीही मजुरी व विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. मे महिन्यात मिठाचे उत्पादन सर्वाधिक होत असून हंगामात साठवले जाणारे मीठ पावसाळ्यापूर्वी झाकून ठेवले जाते. मात्र मे महिन्याच्या आरंभीच झालेल्या जोरदार पावसाने मिठागरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तलासरी, डहाणू, पालघर, वाडा, वसई या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची सर्वाधिक झळ बसली असून दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पालघर शहर सह अनेक ठिकाणी ७ मे च्या दिवसभरात तब्बल ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मे २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पालघर शहरात ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर दर दुसऱ्या वर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या घटना दिसून आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वातावरण बदलामुळे तसेच पश्चिम व पूर्व कनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळामुळे सप्टेंबर मध्ये संपणारे मान्सून हंगाम गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर पर्यंत सुरू राहत आहे. त्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याच्या घटना सलग काही वर्ष होत असल्याने शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांच्यासह इतर सर्व घटक वारंवार नुकसानीला सामोरे जात आहे. शासनाकडून यापैकी काही घटकांना नुकसान भरपाई दिली जात असली तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम विलंबाने व तुटपुंज असल्याचे देखील दिसून आले आहे. देशातील विविध भागांमधून उपलब्ध होणाऱ्या उत्पादनामुळे स्थानिक उत्पादनाला पूर्वी इतका दर मिळत नाही. त्यामुळे नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून वेगवेगळ्या समयी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिकांना आपले पारंपारिक व्यवसाय करणे कठीण झाले आहे.