पालघर जिल्ह्यात पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या तलासरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणाने जिल्हा हादरला होता. दोन सख्ख्या भावंडांमधिल अंतर्गत वाद इतक्या शिगेला गेला होता की लहान भावाने मोठ्या भावाचे अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस स्टेशन मधून निसटला आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पाच महिने लागल्याने पोलीसांच्या कार्यक्षमता आणि प्रकरणातील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.

अशोक धोडी आणि अविनाश धोडी हे दोघे सख्खे भाऊ महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजी गावातील रहिवासी. दोघांची ही नावे अवैध्य व्यवसायात अग्रेसर होती. त्यामधील अशोक धोडी यांनी वेळीच सावरत चांगल्या मार्गाचा अवलंब केला होता. मात्र अविनाश धोडी अवैध्य व्यवसायात कायम राहिला असून काही वर्षातच त्याने शासकीय यंत्रणांच्या छुपा पाठिंबा मिळवून मोठी माया जमवली होती. अविनाशच्या अवैध्य व्यवसायांविषयी अशोक धोडी यांनी अनेक वेळा शासकीय स्तरावर तक्रारी केल्या होत्या तसेच त्यांच्यात अंतर्गत जमिनीचा वाद निर्माण झाला होता. याचा राग मनात धरून अविनाश याने आपल्या आठ साथीदारांच्या मदतीने २० जानेवारी रोजी डहाणू येथून घरी परतणाऱ्या अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केली.

पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या काही वर्षात अवैध्य मद्य तस्करी, गुटखा तस्करी सारखे व्यवसाय फोफावले आहेत. शासकीय यंत्रणा देखील आर्थिक हितसंबंधांमुळे या सर्वांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे याभागातील अवैध्य व्यवसायांना चालना मिळत आहेत. या गैरधंद्यांमुळे झटपट पैसे मिळत असल्यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला चलाना मिळात आहे. या भागातून दमण राज्यात स्वस्त दरात मिळणारे आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेले मद्य तसेच गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत असून यामध्ये अविनाश धोडी कार्यरत होता असे सांगितले जात आहे. त्याच्या हाताखाली शेकडो तरुण या व्यवसायात गुंतले होते. हा धंदा बंद करून चांगल्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी अशोक धोडी यांनी अविनाश धोडीला समज देऊन सुद्धा तो जुमानत नसल्यामुळे अशोक धोडी यांनी अविनाश विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याचे सांगितले जाते.

अशोक धोडी आपल्या व्यवसायाची पोलीस ठाण्यात तक्रार करत असल्याच्या राग अविनाशच्या मनात असून त्यातच त्यांच्या घरघुती जमीन वाटणीचा वाद निर्माण झाल्यामुळे अविनाशने मनात राग धरून २० जानेवारी २०२५ रोजी अशोक धोडी यांचे अपहरण केले. अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात धोडी बेपत्ता असल्याची तक्रार केली. तसेच त्यांचे अपहरण झाले असावे असा संशय व्यक्त करून पोलिसांना इतर संशयितांची नावे दिली होती. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु असताना अविनाश धोडी पोलीस ठाण्यातून निसटून फरार झाला होता. त्यांनतर या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींकडून मिळालेल्या माहिती नुसार एखाद्या सिनेमा मध्ये शोभेल अश्या पद्धतीने अशोक धोडी यांची हत्या करून मृतदेह गुजरात राज्यातील सरीगाम येथील एका बंद दगड खदाणीतील तलावात टाकल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार मिळून येत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पदाची धुरा यतिष देशमुख यांनी हाती घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसात मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि मनोज राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी अविनाश धोडी यांचा महाराष्ट्र सह गुजरात आणि राजस्थान मध्ये कसून शोध सुरू होता. दादरा नगर हवेली मधील सेलवास येथील एका मित्राच्या घरी अविनाश दबा धरून बसला होता. त्याच्या एका मैत्रिणीच्या इंस्टाग्राम खात्याचा आधार घेऊन आरोपी व त्याच्या पत्नीचा संवाद सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळविली. त्यानंतर तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता अविनाश धोडी पर्यंत पोलीसांना पोहोचता आहे. त्याला ८ जून रोजी अटक करण्यात आली आहे. अविनाश धोडी अटक झाल्यानंतर १२ जून रोजी दुसरा मुख्य आरोपी मनोज राजपूत (रा. काकुरवास जि.पाली, राजस्थान) याला ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील एका गावातून अटक करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील तलासरी आणि डहाणू तालुक्यामध्ये अलीकडे अवैध्य व्यवसाय फोफावल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील झाई, वेवजी, तलासरी, उधवा, गडचींचले भागातून दमण बनावटीचे मद्य आणि गुटखा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणला जात आहे. महाराष्ट्रात विक्री आणि सेवनासाठी बंदी असलेले मद्य आणि गुटखा सर्रास जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात मिळत असल्यामुळे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमावर्ती भागात वाढत्या अवैध्य व्यवसायांमुळे तरुणांचा वाम मार्गाने पैसे कमवण्याकडे कल वाढला असून यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत आहे. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा एवढी मजबूत असताना राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये सुरू असलेल्या अवैध्य व्यवसायांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांचा कायदा व सुव्यस्थेवरून विश्वास कमी होऊ लागला आहे. शासकीय यंत्रणेबाबत जनतेच्या मनात भीतीयुक्त आदर पुनर्स्थापित व्हावा यासाठी ठोस पावले उलचलाने आवश्यक आहे.