पालघर : तारापूर अणुशक्ती प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पोफरण, अकरपट्टी, दांडी, घिवली व इतर गावांतील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या उपस्थितीत प्रकल्प व्यवस्थापनाशी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न, मागण्या आणि त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नियमित व कंत्राटी नोकरभरतीमध्ये प्राधान्य देणे, तसेच कंत्राटी सेवांमध्ये स्थानिकांचे समावेश वाढवणे, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पहिली ते १२ वी पर्यंत दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे. नववी ते बारावी आणि एइसीएस शाळेत १ली ते ८ वी साठी च्या स्थानिक विद्यार्थ्यांना फी माफी लागू करण, रस्ते, पाणी, गटार, आरोग्य, वीज अशा मूलभूत सुविधांसाठी बाधित गावांमध्ये सामाजिक जायित्व निधीचा योग्य वापर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत स्थायिक समस्यांवर उपाय योजना आखण्याबाबत विचार करताना सुमारे १७५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यांच्यासाठी विशेष नोकरी कोटा ठरवावा, कंत्राटी कामगारांना निश्चित ड्युटी, विशेष भत्ता आणि १७ भरपगारी रजा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. एम पी सी आय एल व्यवस्थापनाने विनाकारण नोकर कपात थांबवावी, कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने कामगार कमी करणे थांबवावे व यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत असे देखील सुचविण्यात आले. नोकर भरती संदर्भात व इतर नवीन निविदांमध्ये स्थानिकांचा समावेश अनिवार्य करावा अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्या बैठकीत ठोसपणे मांडण्यात आल्या असून प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांनी याची तात्काळ दखल घ्यावी व सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत चर्चेला आलेल्या इतर काही इतर समस्या:
• कॅन्टीनमध्ये होणारा दुजाभाव थांबवावा.
• घिवली गावाला पाणीपुरवठा सुरू करून सामाजिक दायित्व निधीतून विकासकामे करावीत.
• प्रकल्प शाळेत घिवलीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा.
• ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत, अशा प्रकल्पग्रस्तांना तत्काळ घरे देण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.