पालघर : पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ११ वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही अजून जिल्ह्यात अद्ययावत शासकीय रुग्णालय कार्यरत नाही. पालघरजवळ जिल्हा सामान्य रुग्णालय व मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर ची उभारणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पालघरच्या खासदार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेतली.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले.

रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता मनोर येथे २०० खाटांचे प्रस्तावित ट्रॉमा सेंटर कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ₹१२० कोटींची प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील ₹६३ कोटींचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. तथापि उर्वरित ₹५७ कोटी निधी अद्याप वितरित झालेला नसल्यामुळे प्रकल्प रखडलेला आहे.

मनोर येथे ट्रॉमा सेंटर च्या उभारण्यासाठी शिल्लक निधीच्या तत्काळ वितरणाची विनंती खासदार यांनी केली आहे. जिल्ह्यातील या भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी हा निधी तात्काळ वितरित होणे आवश्यक आहे, असे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

पालघर जिल्हा रुग्णालयासाठी वाढीव ₹१४८.२८ कोटी वित्तीय मंजुरीची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०२० रोजीच्या निर्णयानुसार पालघर येथे २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी ₹२०९.११ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुधारित दरपत्रक (डी एस आर २०२०-२१)

अनुसार बांधकाम किंमतीमध्ये १८ टक्के वस्तू सेवा शुल (जीएसटी) आणि बांधकाम साहित्य दरवाढीमुळे एकूण प्रकल्प खर्च वाढून ₹३५७.३९ कोटी झाला आहे. या अनुषंगाने अतिरिक्त ₹१४८.२८ कोटी निधीसाठी वित्तीय मान्यता मिळवून देण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोन्ही प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, जेणेकरून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकतील.भविष्यात उपचारासाठी मुंबई, ठाणे, वापी किंवा इतर रुग्णालयांमध्ये जावे लागू नये. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळावा यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू आहे.” – खासदार डॉ. हेमंत सवरा