पालघर: १६ जून पासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार असून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असून शाळेच्या सुरुवातीलाच गणवेश देण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन असल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी जाणार आहे.
जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीचा आनंद घेवून १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत परतत असल्याने शंभर दिवस शाळा भेटीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागाच्या १३३ कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्प व शालेय वस्तू देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक वर्गाकडून शाळेतील वर्ग व आवाराची स्वच्छता सुरू आहे. बहुतांश शाळांमध्ये वर्गांना रंगरंगोटी, फळाना रंग देणे, वर्गांमध्ये पताका लावणे, प्रवेशद्वारावर रांगोळी व स्वागत फलक लावण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक मूल शाळेत यावे म्हणून शालेय शिक्षण विभागाद्वारे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानादरम्यान सर्व पुस्तके पोचविण्यात आली आहेत. जिल्हा परिषद शाळेतील २,७२,२१३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १६,२५,१३८ पाठयपुस्तके तर अंशत: अंध (अपंग) १०३ विद्यार्थ्यांसाठी ठळक अक्षरातील (लार्ज प्रिंट) ६७९ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून ही पुस्तके शासनाच्या बालभारती विभागाकडून जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत व राज्य सरकारच्या गणवेश योजनेअंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते इयत्ता आठवीच्या वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती मुले अनुसूचित जमाती मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील पालकांची मुले अशा एकूण एक लाख ५६ हजार १९१ विद्यार्थ्यांना गणवेश तयार करण्याकरता पीएफएमएस प्रणाली द्वारे राज्य सरकारकडून जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे ४,६८,५७,३०० इतका निधी वर्ग करण्यात आला होता. हा निधी शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे व त्यानंतर तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांना शाळेची ओढ वाढावी, उत्साह यावा याकरिता १०० दिवस शाळा भेटीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तसेच सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके दाखल झाली असून गणवेश देखील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वाटप करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक पालघर