पालघर : पालघर जिल्ह्यात १४,३२८ अपंग व्यक्तींची केंद्र सरकारच्या अपंगांसाठी असणाऱ्या स्वावलंबन पोर्टलमध्ये नोंदणी होऊन त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले असले तरीही जिल्ह्यातील व विशेषतः ग्रामीण भागातील अनेक अपंग बांधव या नोंदणी पासून वंचित राहिले आहेत. अशा वंचित राहिलेल्या प्रत्येक अपंग व्यक्तीची नोंद स्वावलंबन पोर्टलवर करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र व ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने २० ते २२ मे दरम्यान “दिशा – यूडीआयडी साठी एक पाऊल” ही विशेष मोहीम राबविण्याचे योजिले आहे.
जिल्ह्यात असणाऱ्या बहुतांश अपंग बांधवाची नोंद केंद्र सरकारच्या स्वावलंबन पोर्टलवर करण्यात आली असली तरीही ग्रामीण भागातील तसेच स्थलांतर झालेल्या अनेक अपंग बांधवांची नोंद करणे प्रलंबित राहिले आहे. असा यूडीआयडी कार्ड नसणाऱ्या अपंग बांधवांचा शोध घेऊन या प्रमाणपत्र व कार्ड मिळण्यासाठी अर्ज भरून घेण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे (जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय) विशेष मोहीम राबविण्याचे योजिले आहे.
या तीन दिवासीय विशेष मोहिमेत २० मे रोजी अपंग व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येणार असून २१ मे रोजी आपापल्या ग्रामपंचायत मध्ये कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) मध्ये ऑनलाइन फॉर्म भरून कागदपत्रांची नोंद करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अखेरच्या दिवशी (ता २२) उर्वरित अर्ज पूर्ण करून या पोर्टलवर नोंदणी नसलेल्या अपंगांकडून प्राप्त होणारे उर्वरित अर्ज पूर्ण करून अशांची यादी अंतिम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अपंगांच्या या पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड विज बिल असे पुरावे, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच त्यांच्याकडे असल्यास जुने अपंगत्व प्रमाणपत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे. या मोहिमेत ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, शिक्षक व गावातील सीएससी ऑपरेटर सहकार्य करणार असून अभियानात सहभागी होणाऱ्या या सर्व घटकांचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.प्राप्त झालेल्या अर्जांविषय तालुका निहाय माहिती संकलित करून अर्जदारांच्या अपंगत्वाचा प्रकार जाणून त्या पद्धतीने तालुका निहाय विशेष शिबिरांचे आयोजन करून संबंधितांना अपंगत्व प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड देण्यासाठी व्यवस्था आखण्यात येणार आहे.
अभियानामुळे अपंगांना मिळणार लाभ
युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड्स अर्थात अपंगत्व ओळखपत्र असणाऱ्या नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत, आरोग्य सेवा शिक्षण व रोजगार संदर्भात शासकीय योजना लागू होतात. मात्र अज्ञानामुळे अथवा जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहत असल्याने अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात फेऱ्या मारून असे कार्ड मिळवणे त्रासदाय ठरत असते. या विशेष अभियानामुळे स्वावलंबन पोर्टलवर नोंदणी नसणाऱ्या अपंग व्यक्तींची माहिती तालुका निहाय उपलब्ध होणार असून विशिष्ट प्रकारच्या अपंगांची संख्या लक्षात घेऊन तालुका स्तरावर अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे जिल्हा प्रशासनाचे निश्चित केले आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अपंग व्यक्तींची माहिती अर्जावर भरण्याकडे लक्ष देण्यात येणार असून त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगण्यात आले. यामुळे अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात माराव्या लागणारा फेऱ्या कमी होणार असून सहजतेने शासनाकडून उपलब्ध होणारा लाभ अशा विशेष व्यक्तींना मिळू शकणार आहे.
जिल्ह्यातील अपंगांची यूडीआयडी कार्ड प्रणाली मध्ये नोंद व्हावी या दृष्टीने २० ते २२ मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यादृष्टीने महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक सामान्य सेवा केंद्रातील डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रणाली मध्ये जिल्ह्यातील सर्व अपंगांची नोंद होण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल. – डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर
“दिशा – यूडीआयडी साठी एक पाऊल अभियान” अंतर्गत स्वावलंबन पोर्टलवर नोंदणी नसणाऱ्या जिल्ह्यातील अपंगाची माहिती ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, शिक्षक तसेच तलाठी व सीएससी ऑपरेटर यांच्यामार्फत या विशेष बियाणं जाणार आहे. याचा लाभ नोंदणी न झालेल्या अपंग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आगामी काळात होऊ शकेल. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर