पालघर : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवी इयत्तेपर्यंत शिकणाऱ्या एक लाख २० हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त १६ टक्के विद्यार्थी (१८ हजार) हे मराठी, इंग्रजी व गणित या विषयात निपुण असल्याचे तर त्यापैकी ४९ टक्के (५७ हजार) विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा निपुण स्तर ७५ टक्क्यापर्यंत नेण्यासाठी निपुण पालघर अभियान राबवले जात आहे. या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा १५ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत असून याकरिता शिक्षण विभाग (प्राथमिक) व शिक्षकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

पालघर जिल्ह्यात येणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या अनुषंगाने नव्या पिढीला भविष्यातील येऊ पाहणाऱ्या रोजगाराची संधी सहजगत उपलब्ध व्हावी यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान राबविण्याचे योजिले आहे. यामध्ये इयत्ता दुसरी ते आठवी इयत्ते मधील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता विकसन करणे तसेच अध्ययन निष्पत्ती विकसन करण्यासाठी १५ जुलै ते १५ ऑक्टोबर पर्यंत तीन टप्प्यात अभियानाची आखणी करण्यात आली आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेत असलेल्या २११० शाळांमधील १.२१ लक्ष विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटवर पायाभूत चाचण्या घेऊन त्यांचे भाषण, वाचन, लेखन व गणन याची सद्यस्थिती अभ्यासली गेली होती. यामध्ये मराठी भाषा वाचनात ३९ टक्के, लेखनात ५८ टक्के विद्यार्थ्यांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसून आले. तर इंग्रजी भाषा वाचनात ५० टक्के व लेखनात ६४ टक्के विद्यार्थ्यांची कामगिरी आवश्यक क्षमतेपेक्षा कमी होती. गणितामध्ये देखील संख्याज्ञान (४० टक्के) व संख्येवरील क्रिया (४४ टक्के) यांचा स्तर कमी असल्याचे दिसून आल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याचे या उपक्रमाअंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले.

या निपुण उपक्रमाच्या प्राथमिक पाहणीमध्ये पालघर तालुक्यात २४ टक्के विद्यार्थी निपुण असल्याचे दिसून आले होते तर वाडा तालुक्यातील २२ टक्के, वसई तालुक्यातील २० टक्के विद्यार्थी निपुण असल्याचे दिसून आले. उर्वरित तालुक्यांमधील सद्यस्थितीत निपुण विद्यार्थ्यांची संख्या ही १६ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. गणित विषयात सरासरी २७ टक्के, मराठी भाषेत सरासरी १२.५० टक्के तर इंग्रजी भाषेत अवघे आठ टक्के निपुण असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांमधील काही शैक्षणिक बाबींमध्ये वृद्धी आणणे आवश्यक असून उर्वरित ५७ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाभूत सर उंचाविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमा मधून अपेक्षित होते.

१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील तज्ञ व तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तयार होणाऱ्या विशेष कृती पुस्तिकेच्या आधारे आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलते करणे व त्यांची क्षमता वाढ करण्याचे प्रयत्न केले गेले.

दिवाळीच्या सुट्टीनंतर होणाऱ्या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात या अभियानाची फलनिष्पत्तीची तपासणी केली जाणार असून प्रत्येक नियतीमधील ७५ टक्के मुलांना सर्व आवश्यक क्षमता प्राप्त करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत निपुण दर्जाच्या जवळपास असणारे पातळी एल-२ (२० टक्के) व पातळी एल-३ (१५ टक्के) विद्यार्थी असून जिल्ह्यातील किमान ५१ टक्के विद्यार्थी या उपक्रमाअंती निपुण दर्जा गाठतील असे अपेक्षित आहे.

अभियानाचा दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा

अध्ययन क्षमता व अध्ययन निष्पत्ती विकसन कृती कार्यक्रम राबवणे, ४५ दिवस कृति पुस्तिकेच्या आधारे अध्ययन समृद्धी गुणवत्ता विकास अभियान राबवणे, अधिकारी व कर्मचारी यांना अप्रगत शाळा दत्तक देणे, विविध शैक्षणिक साहित्य अध्यापन पद्धतीचा वापर करून अप्रगत मुलांना प्रगत करणे, अध्ययनक्षमता व अध्ययन निष्पत्ती तपासणीसाठी चाचणी आयोजन करणे, चाचणी डेटा संकलित करून केंद्र व तालुका निहाय प्रसिद्ध करणे, शाळा अप्रगत ठेवणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर योग्य कारवाई करणे, चांगली कामगिरी बजावणाऱ्याना प्रोत्साहित करणे.

वर्गनिहाय निपुण विद्यार्थ्यांची सद्यस्थिती (टक्क्यांमध्ये)

  • इयत्ता दुसरी (११), इयत्ता तिसरी (११), इयत्ता चौथी (१८), इयत्ता पाचवी (१६), इयत्ता सहावी (१८), इयत्ता सातवी (१९), इयत्ता आठवी (२१)

वर्गनिहाय समाधानकारक दर्जा नसलेल्या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती (टक्क्यांमध्ये)

  • इयत्ता दुसरी (६७), इयत्ता तिसरी (५९), इयत्ता चौथी (४४), इयत्ता पाचवी (४५), इयत्ता सहावी (४२), इयत्ता सातवी (३९), इयत्ता आठवी (३५)

निपुण पालघर अंतर्गत अध्ययन स्थर पडताळणी मध्ये नवघर (६२ टक्के), सफाळे (५१ टक्के), हमरापुर (३९ टक्के), नांदगाव तर्फे तारापूर (३८ टक्के) व बाडापोखरण (३८ टक्के) या क्लस्टरची कामगिरी जिल्ह्यात अव्वल ठरली असून पाथर्डी, झाई, आसे, मोहाचा पाडा व जव्हार या क्लस्टर मधील कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ३७१ शाळांमध्ये शून्य टक्के विद्यार्थी असून जिल्ह्यातील १०६१ शाळांमध्ये निपुण विद्यार्थ्यांची संख्या ही १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबाबत असणाऱ्या कमतरतांचा शोध घेऊन नंतर विद्यार्थ्यांना निपुण ठरवण्यासाठी निकष इयत्तानिहाय ठरवण्यात आले. त्यांनंतर शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी यांचा अध्ययन स्तर निश्चित केला. निश्चित केलेला स्तर पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. वर्गातील सर्व विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तज्ञ शिक्षक व प्राध्यापकांच्या सहकार्यातून तयार केलेल्या कृती पुस्तिकेच्या आधारे अध्ययन- अध्यापन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या निपुण अंतर्गत अपेक्षित सर्व क्षमतांचा विकास करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून २८१ क्षेत्र भेट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व शाळांची कसून तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना किमान शैक्षणिक क्षमता आत्मसात व्हाव्यात या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. – सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या विकासाच्या प्रवाहात नव्या पिढीला उद्यमशीलता व रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी या उपक्रमांअंतर्गत प्रयत्न केले गेले असून असे प्रयत्न जिल्ह्यात निरंतर सुरु राहतील. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच निपुण भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरून विविध उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. बालवाटिका ते इयत्ता तिसरीच्या (वयोगट तीन ते नऊ वर्ष) या विद्यार्थ्यांना सन २०२६ अखेरीस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे या दृष्टीने विविध वयोगटानुसार व इयत्तानिहाय लक्ष निर्धारित करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली असून या धोरणात सुचविलेल्या नवीन संरचने पायाभूत स्तर बालवाटिका ते इयत्ता दुसरी तर पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी असा निर्धारित करण्यात आला असला तरीही पालघर जिल्हा परिषदेने निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान पालघर जिल्ह्यातील २१२० शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे.

निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान उद्देश

  • विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रगती जाणून घेणे व त्यांची गुणवत्ता वाढवणे
  • शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन व विश्लेषण
  • शाळांचा भौतिक व रचनात्मक विकास करणे
  • प्रत्येक शाळा केंद्र तालुका यांचे शैक्षणिक स्थळ ठरविणे
  • शिक्षण अधिकारी व कर्मचारी यांची क्षमतावृद्धी करणे
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा मागोवा घेणे

निपुण विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी उद्दिष्ट साध्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याकरिता विनोबा ॲप ची मदत घेण्यात येणार आहे. असे करताना नियमित अभ्यासक्रमासोबत उच्चक्षमता प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. ओएमआर शीटच्या माध्यमातून उत्तरपत्रिकाचे पृथकरण केले जाऊन विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या मर्यादांचा अभ्यास करून त्यांच्याकडे आवश्यकतेनुसार विशेष लक्ष देण्याचे देखील या योजनेत अंतर्भूत आहे.