पालघर: समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आता दुसऱ्या व्यक्तीला जाण्याची आवश्यकता नसून रोबोटिक बोट बुडणाऱ्या व्यक्तीसाठी संजीवनी ठरणार आहे. २०० किलो वजन उचलू शकणारी व एक किलोमीटर समुद्रात जाऊ शकणारी ही बोट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून सागरी पोलीस ठाणे आणि नगरपरिषद अशा १० विभागांना वाटप करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांवर पोहता पोहता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना या अगोदर घडलेल्या आहेत. होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यात रोबोटिक बोटींचा वापर सुरू करण्यात आला आहे. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून या बोटी सागरी पोलीस ठाणे आणि नगरपरिषदा यांना वाटप करण्यात आल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संबंधित प्रशासनाला रोबोटिक बोट प्रशिक्षण देण्यात आले असून २५ मे रोजी बोट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी दोन वाजता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवा, विजया गोस्वामी, पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी, अदिवाल आणि सर्व सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगर पंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक कोटी ६६ लाख निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग विभागास उपलब्ध करुन देण्यात आला. त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका एक नगरपंचायत असे दहा ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत करण्यात आले.
बोटीचे वाटप
केळवे, सातपाटी, वानगाव, डहाणू, घोलवड, तारापूर या सहा सागरी पोलीस स्टेशन, पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद व वाडा नगरपंचायत अशा एकूण दहा बोटी वाटप करण्यात आलेल्या आहेत.
बोट ठरणार संजीवनी
ही बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो. पण आता दुसऱ्या माणसा ऐवजी ही रोबोटीक बोट एक एक किलोमीटर आत पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे. या बोटीची दोनशे किलोग्राम पर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे.
पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या रोबोटिक बोटींचा वापर रिमोट कंट्रोलद्वारे केला जाणार असून यामुळे समुद्रातील दुर्घटनांमध्ये मदत करता होणार आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी या बोटी उपयुक्त ठरतील. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून या उपक्रमाला पाठिंबा मिळत आहे. – विवेकानंद कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी