पालघर : बोईसर भिमनगर येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वे यार्डच्या भरावामुळे भिमनगर परिसरात पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी समग्र प्रणाली उभारण्याच्या दृष्टीने एकत्रित निर्णय घेण्याची अशी ग्वाही पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने रेल्वे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने तातडीने पावले उचलले आवश्यक असून अन्यथाभिमनगर, संजय नगर, साईबाबा नगर परिसरात या भागात पावसाळ्यात वारंवार पर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पातर्गत बोईसर पश्चिमेला असणारे मालवाहू यार्ड भिमनगरच्या उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या मोकळ्या जागेत उभारण्यात येत आहे. या उभारणीच्या कामात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आल्याने प्रणाली, बीएआरसी कॉलनी या भागातून येणारे पावसाचे पाणी तसेच यार्डाच्या परिसरात गोळा होणारे पाणी भिमनगर परिसरातून वाहणाऱ्या अरुंद नैसर्गिक नाल्या मधून जाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. यामुळे भिमनगर, साईबाबा नगर, संजय नगर परिसरात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली होती.
या संदर्भात भिमनगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्यानंतर तसेच या संदर्भात लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थळ पाहणी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे उपमुख्य अभियंता प्रकाश जोशी व सहकाऱ्यांनी भिमनगर रहिवाशांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी केली. याप्रसंगी संजय पाटील, महेंद्र भोने, हर्षद लोखंडे, आप्पा लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाने या नवीन यार्डाची आखणी करताना यार्ड परिसरात गोळा होणारे पावसाचे पाणी एकत्रित करून भिमनगर येथून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात सोडण्याचे प्रयोजन केले आहे. नाल्याची रुंदी वाढवणे, परनाळी व बीएआरसी कॉलनी मधून येणारे पावसाचे पाणी रोखून या पाण्याची दिशा बदलण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे प्रथम भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांना नियोजन करताना रेल्वेने स्थळ पहाणी व सद्यस्थितीचा अभ्यास केला होता का असे आक्रमक विचारणा केली असता बोईसर परिसरातील या भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलचिन्हांकित (हायड्रोग्राफिक) सर्वेक्षण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
भिमनगर परिसराच्या उत्तरेला पूर्वी असलेल्या मोकळ्या जागेत भराव झाल्याने त्या ठिकाणी जमणाऱ्या पाण्याची विभागणी करणे, नैसर्गिक उतारा विरुद्ध काही प्रमाणात पाणी पंपाद्वारे पूर्वेच्या दिशेला नेण्याची व्यवस्था करणे, या भागात पूर्वीपासून असणाऱ्या तलावाची खोली वाढवून पाण्याचा साठा करणे, भिमनगर येथील नाल्याचे रुंदीकरण व गाळ काढणे, कुरगाव कडून येणारे पाणी तसेच साईबाबा नगर व इतर भागात पाण्याचा निचरा सहजगत होण्याच्या दृष्टीने उपाय योजना आखण्याचे निश्चित करण्यात आले.
जलचिन्हांकित सर्वेक्षणानंतर सर्व संबंधित घटकांची एकत्रित बैठक आयोजित करून पावसाळ्यापूर्वी तातडीने करावयाच्या व नंतर दीर्घकालीन उपाययोजना अमलात आणण्यासाठी उपरेषा तयार करण्यात येईल असे रेल्वेचे अधिकाऱ्याने आश्वासन केले. भिमनगर परिसरात कोणत्याही परिस्थितीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहणार असून याकामी आवश्यक निधीची उपलब्धता करून देईल असे आश्वासन ग्रामस्थांना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.