पालघर: पालघर नगरपरिषद व माहीम ग्रामपंचायत हद्दीमध्ये वसलेल्या पालघर येथील बिडको औद्योगिक वसाहतीकडे व आजूबाजूच्या पाड्यांकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय आहे. या औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या जवळपास ५०० कंपन्यांमध्ये काम करणारे २० हजार कर्मचारी व आजूबाजूच्या गावातील १० ते १५ हजार नागरिकांना या मार्गाचा दैनंदिन वापर करावा लागत असून पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

पालघर येथील एमआयडीसीनंतर बिडको ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. यामध्ये औषध निर्मितीपासून ते लघु व मोठे उद्योग अशा जवळपास ५०० कंपन्या कार्यरत आहे. या कारखान्यांमध्ये मुंबई, डहाणू व शहरातील जवळपास २० हजाराहून अधिक कर्मचारी कामानिमित्त जात असतात. तसेच बिडको वसाहतीलगत चिंटूपाडा, भरवडपाडा व इतर पाडे वसले असल्याने जवळपास १५ हजाराची लोकवस्ती या भागात आहे. असे असताना बिडको औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त करण्यात आला नसल्याने खड्डेमय झाला आहे.

या मार्गावरून दैनंदिन शेकडो मालवाहू वाहने, चार चाकी गाड्या व कर्मचाऱ्यांच्या दुचाकीची वाहतूक होत असते. २३ मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे पहिल्याच दिवशी हा रस्ता चिखलीयुक्त व तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. अवजड वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाड्यांना तोल जाईल अशी भीती निर्माण होत असते तर दुचाकी नेणाऱ्यांना तर या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागते.

बिडको वसाहतिचा काही भाग हा पालघर नगर परिषद व माहीम ग्रामपंचायत हद्दीत विभागला गेला असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद व ग्रामपंचायतीकडे या रस्त्याकरिता निधी उपलब्ध नाही का किंवा जर निधी आहे तर रस्त्याची दुरुस्ती का केली जात नाही. दैनंदिन नागरिकांनी अजून किती दिवस या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे देखील कठीण होत असते. मात्र नगर परिषद व ग्रामपंचायत याबाबत डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पावसाळा दरम्यान या रस्त्यांची स्थिती अतिशय भयानक होत असून येथे मोठमोठाल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. अशावेळी दुचाकी घेऊन जाताना तोल जाऊन अनेक वेळा अपघात देखील घडले आहेत. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थानकडे तक्रार करून देखील या रस्त्याची सुधारणा झालेली नाही. – अनिल पुजारी, नागरिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहीम ग्रामपंचायतकडे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी नसून या रस्त्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. बिडको औद्योगिक वसाहतीकडील रस्त्याबाबत आपण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडे पाठपुरावा करत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे माहीम ग्रामपंचायतचे प्रकर्षाने लक्ष आहे. – प्रीती पाटील, सरपंच माहीम ग्रामपंचायत