कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांनी टीपू सुलतानबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीकास्र सोडलं.

हेही वाचा – ‘कमळ’ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापूरच्या आखाड्यात; सहकार क्षेत्रातही लगबग

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?

यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना, मी टीपू सुलतानचं नाव वारंवार घेईन, तुम्ही काय करता ते बघतोच, अशी संतप्त प्रतिक्रिया असदुद्दीन ओवेसी यांनी दिली. तसेच कर्नाटक भाजपा अध्यक्षांच्या विधानाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का? भाजपा कतील यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याबरोबरच कतील यांचं विधान हिंसा आणि नरसंहार घडवण्यसाठी प्रोत्साहन देणारं आहे, असेही ते म्हणाले.

नलीनकुमार कतील नेमकं काय म्हणाले होते?

कर्नाटमधील येलाबुरगा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना कतील यांनी टीपू सुलतानबाबत वादग्रस्त विधानं केलं होतं. आम्ही टीपू सुलतानचे वंशज नाही, तर आम्ही भगवान राम आणि बजरंगबलीचे भक्त आहोत. आम्ही टीपू सुलतानच्या वंशजांना राज्यातून बाहेर काढलं आहे. जे लोक टीपू सुलतानचे समर्थन करतात त्यांना जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जे लोक भगवान राम आणि बजरंगबलीचे भक्त आहेत, तेच लोक कर्नाटकमध्ये राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हेही वाचा – तेलंगाणात काँग्रेस १०० राम मंदिर उभारणार? प्रदेशाध्यक्षांनी केले मोठे विधान, म्हणाले “आमचे सरकार आल्यास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीपू सुलतानच्या वंशजांनीही व्यक्त केली नाराजी

दरम्यान, राजकीय नेत्यांनाकडून स्वत:च्या सोयीनुसार टीपू सुलतानच्या नावाचा वापर होत असल्याचे म्हणत टीपू सुलतानाच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली होती. संदर्भात न्यूज १८ शी बोलताना, “राजकीय नेते त्यांच्या सोईप्रमाणे टीपू सुलतान यांचे नाव वापरतात. असं करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. यापुढे टीपू सुलताना यांच्या नावाचा गैरवापर करण्याऱ्यांविरोधात आम्ही अब्रुनुकसानी दावा दाखल करू”, अशी प्रतिक्रिया मन्सूर अली यांनी दिली होती.