ठाणे : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा बालेकिल्ला ठरलेल्या कोकण पट्ट्यात यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीपुढे असून कोकण, रायगड, ठाणे, पालघर या पट्ट्यातील काँग्रेसच्या १२ जिल्हाध्यक्षांशी सोमवारी रात्री उशिरा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी थेट संवाद साधला. ठाणे, रायगड सारख्या जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे आव्हान परतवायचे असेल तर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहा असे आवाहनही या जिल्हाध्यक्षांना करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागात जागा मिळाल्या नसल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये मुझफ्फर हुसैन आणि भिवंडी पश्चिममध्ये दयानंद चोरगे यांचा अपवाद वगळला तर, कोकण, ठाणे, रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला अधिकच्या जागा आलेल्या नाहीत. ठाणे जिल्ह्यात पक्षाची अवस्था अगदीच तोळामासा असली तरी ठाणे, कल्याण आणि ग्रामीण पट्ट्यात किमान एक जागा मिळावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह होता. मात्र, या पट्ट्यातील बहुसंख्या जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्या आणि काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले. कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात काँग्रेसचे अविनाश लाड यांनी कडवी लढत दिली होती. ११ हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या लाड यांचा या मतदारसंघावर पुन्हा दावा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे लाड यांनी येथून बंडखोरी केली आहे. कल्याण पूर्वमध्ये सचिन पोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐरोलीमध्ये माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचा एकही नेता उद्धव सेनेचे उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचार रॅलीत फिरकला देखील नाही. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे, कल्याण पट्ट्यात उद्धव सेनेच्या उमेदवारांविरोधात सामूहिक अर्ज दाखल करायचे असा बेत काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर आखला जात होता. या बंडाची कुणकुण लागल्यामुळे कोकण पट्ट्यातील १२ जिल्हाध्यक्षांना सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील टिळक भवन येथे पाचरण करण्यात आले.

हेही वाचा – वामन म्हात्रे अंबरनाथमध्येच, मुरबाडपासून दूर

महाविकास आघाडीसोबतच रहा

काँग्रेस पक्षातील नाराजी मित्र पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, कोकण विभागातील जिल्हा अध्यक्षांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी रात्री मुंबईतील टिळक भवन येथे पार पडली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, कर्नाटकचे गृहमंत्री गंगाधरैया परमेश्वरा आणि कोकण चे प्रभारी बी एम संदीप यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत तिकीट वाटपाबाबत असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपापल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना करण्यात केल्या. याच बैठकीदरम्यान काही जिल्हाध्यक्षांशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोनवर संवाद साधला. जे काही मतभेद असतील ते विसरून निवडणुकीच्या कामात सक्रिय होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

उमेदवारी मागे घ्यावी यासाठी गहलोत यांच्या उपस्थितीत आमची बैठक घेण्यात आली. राहुल गांधी यांनी दूरध्वनीवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील पाच वर्षांपासून मी काम करत असल्यामुळे उमेदवारी मागे घेणार नाही. – अविनाश लाड, काँग्रेस बंडखोर, राजापूर मतदारसंघ

हेही वाचा – पुसदमध्ये नाईक घराण्यात उभी फूट, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण पट्ट्यात पक्षाला जागा मिळाल्या नसल्यामुळे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोकण पट्ट्यातील १२ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही काही जिल्हाध्यक्षांशी संवाद साधून कामाला लागण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन निवडणूक कामाला सुरुवात करणार आहोत. – विक्रांत चव्हाण, अध्यक्ष, ठाणे शहर काँग्रेस