नांदेड : महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर पुढील काळात दुसर्‍या सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्याची परंपरा राज्यात शंकरराव चव्हाण यांच्यापासून सुरू झाली. पण काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांना शंकररावांची ‘ती’ कृती खटकली होती. त्यांना त्याचा रागही आला होता… राजकारण आणि सार्वजनिक जीवनात शंकररावांना नेता आणि ज्येष्ठ मित्र मानणारे माजी केंद्रीय मंत्री आणि नगर जिल्ह्यातील एकेकाळचे प्रभावशाली नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोणी येथे  नुकतेच पार पडले. या आत्मकथेत इंदिरा गांधी यांच्याशी झालेल्या एका भेटीतील चर्चेचा तपशील नोंदवताना विखे पाटील यांनी शंकररावांच्या ‘त्या’ कृतीवर इंदिराबाई काय म्हणाल्या, ते शब्दशः नोंदविले आहे.

विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रथम प्रकाशित झाले तेव्हा ते स्वतः आणि शंकरराव चव्हाणही हयात नव्हते. त्यामुळे वरील संदर्भाने झालेल्या उल्लेखाचे कोणी खंडन केले नाही किंवा कोणी त्याला दुजोराही दिलेला नाही. १९८० साली इंदिरा गांधी यांचे केंद्रीय सत्तेत पुनरागमन झाले. शंकरराव त्यांच्याच काँग्रेस पक्षातर्फे नांदेडमधून प्रथमच लोकसभेवर गेले; पण मंत्रिमंडळात शंकररावांना स्थान न मिळाल्यामुळे बाळासाहेबांनी एका भेटीत इंदिराबाईंकडे शंकररावांना मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह धरला होता.

वरील घटनेच्या ३० वर्षांहून अधिक काळानंतर आपली आत्मकथा लिहिणार्‍या बाळासाहेबांनी लिहिले आहे की, शंकररावांना मंत्रिमंडळात घ्यावं असा माझा आग्रह होता. त्यासाठी मी पाच-सहा वेळा मी इंदिराजींना भेटलो. एकदा त्या माझ्यावरच खवळल्या. म्हणाल्या, “मी त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांनी मात्र आमच्या विरोधकांच्या मंत्रिमंडळात साधं मंत्रिपद स्वीकारलं ! आपके लिए बोलो, चव्हाण की क्यूं बात करते हो? आप अपने लिए तो कुछ बातही नहीं करते !” इंदिरा गांधींच्या या मुद्यावर जो काही खुलासा करावा लागला, तोही बाळासाहेबांनी पुढे नमूद केला आहे. पुढे काही महिन्यांनी शंकररावांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, ही बाब त्यांनी नोंदविली आहे.

मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुलोद मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या शंकररावांसंबंधी शरद पवार यांच्यासह काही तत्कालीन नेत्यांनी आपल्याजवळची माहिती नोंदविलेली आहे. एस.एम.जोशी यांच्यामुळे पुलोद मंत्रिमंडळात शंकरराव मंत्री झाले, असे पवार यांनी त्यांच्या आठवणींमध्ये नोंदविले आहे तर माजी खासदार गो.रा.म्हैसेकर यांच्या एका पुस्तकातही त्यावर मोठा तपशील नोंदविण्यात आला आहे.

‘यशवंतराव ते विलासराव’ या पुस्तकातील शंकररावांवरच्या लेखात वेगळीच माहिती आहे. पुलोद मंत्रिमंडळात सहभागी होणे, ही आपल्या राजकीय जीवनातील चुक होती, असे शंकररावांनी म्हटल्याचा उल्लेख त्यात आहे. बाळासाहेब विखेंच्या वरील पुस्तकातून वेगळाच गौप्यस्फोट झाल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंकरराव ते फडणवीस

मुख्यमंत्रिपदी राहिलेली व्यक्ती मंत्री होण्याची पहिली नोंद महाराष्ट्रात १९७८ साली झाल्यानंतर नंतरच्या काळात शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे, शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण यांची नावेही त्यांत समाविष्ट झाली. २०२२ साली विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले.
————-