जगातील सर्वात मोठा पक्ष लोकशाही प्रक्रियेव्दारे अध्यक्ष निवडतो, असे दावे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नागपूर शहर अध्यक्षपदासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडलेल्या तीन नावापैकी एकाही नावाला पसंती न देता माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या रुपात तिसरेच नाव जाहीर केले. आगामी महापालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतांवर डोळा ठेवून पक्षाने तिसरा पर्याय निवडल्याचे बोलले जाते.

प्रत्येक गोष्ट गाजावाजा करूनच करायची या भाजपच्या धोरणानुसार पक्षांतर्गत निवडणुकीचाही गाजावाजा करण्यात आला. शहर, जिल्हा अध्यक्षपदासाठी निरीक्षक नियुक्त केले गेले. त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन नावे निश्चित करून तेी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली. पाठवलेल्या तीन नावांपैकी एकाच्या नावावर सहमती होऊन त्याला शहर अध्यक्ष केले जाईल, अशीच चर्चा होती. यात प्रबळ दावेदार म्हणून विद्मान आमदार प्रवीण दटके यांचे नाव होते. मात्र शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसलेले माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले.

नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हा वर्ग भारतीय जनता पक्षाशी जुळलेला आहे. या वर्गाने विधानसभेची एक जागा मिळावी, अशी मागणी केली होती. पश्चिम नागपूरम,ध्ये हिंदी भाषिकांची असलेली लक्षणीय मते लक्षात घेऊन येथून दयाशंकर तिवारी यांना उमेदवारी द्यावी, असे पक्षातील हिंदी भाषिक नेत्यांचे म्हणने होते. मात्र पश्चिम नागपूर हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे, तेथून गैरमराठी उमेदवार दिला तर कुणबी दूर जातील या भीतीने भाजपने तिवारी यांच्या नावाचा विचार केला नाही. दक्षिण नागपुरातील माजी आमदाराला पश्चिममध्ये तिकीट दिले. त्यामुळे हिंदी भाषिकांचा वर्ग भाजपवर नाराज होता. ही नाराजी महापालिका निवडणुकीत पक्षाला भारी पडू नये म्हणून भाजपने तिवारी यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची सुत्रे दिली. ते करताना पारंपारिक जात समुहाला दूर ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिवारी हिंदी भाषिकांचे नेतृत्व करीत असले तरी ते पक्षाचे एकनिष्ठ सैनिक आहेत शिवाय कट्टर हिंदुत्ववादी ही त्यांची प्रतिमाही भाजपच्या पत्थ्यावर पडणारी आहे. त्यांनी अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. संपूर्ण शहराची व महापालिका प्रशासनाची खडा न खडा माहिती असणाऱ्या मोजक्याच नरसेवकांपैकी ते एक आहेत. भाजप महापालिकेत सत्तेत नव्हती तेव्हा पासून ते एक हाती महापालिकेत भाजपचा किल्ला लढवत होते, मागील १५ वर्षापासून भाजपचीच पालिकेत सत्ता आहे, तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात अहंमभाव दिसला नाही, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे मधूर संंबध आहेत. सूसंस्कृत व अभ्यासू नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे असले तरी महापालिका निवडणुकीत त्यांना आपले कर्तृत्व सिद्द करावे लागणार आहे. गडकरी, फडणवीस, बावनकुळे या बड्या नेत्यांशी जुळवून घेत दुसऱ्या फळीतील पक्षांतर्गत विरोधकांशीही त्यांना दोन हात करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तिवारी यांच्यासाठी भाजपचे शहर अध्यक्षपद काटेरी मुकूट ठरण्याची शक्यता आहे.