भाजपाच्या महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्योती पंड्या यांना नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ज्योती पंड्या गेल्या अनेक दिवसांपासून वडोदराचे खासदार आणि भाजपाचे उमेदवार डॉ. रंजन भट्ट यांना उघड विरोध करीत आहेत. ज्योती यांनी आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती, त्यापूर्वीच पक्षाने त्यांना निलंबित केले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत ज्योती पंड्या यांनी वडोदरा आणि भाजपाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ज्योती यांनी ३८ वर्षे भाजपामध्ये काम केले आहे.

तुम्ही पद सोडण्याचा निर्णय का घेतला?

पायउतार होण्याचा निर्णय का घेतला असे विचारल्यानंतर ज्योती पंड्या म्हणाल्या, ही जाणीव काही काळापूर्वी झाली आहे. पार्टीतल्या स्त्रिया जेव्हा त्यांचा अपमान झाल्याचे मला सांगत होत्या किंवा त्यांच्याशी कठोरपणे वागले गेले होते, अशा गोष्टी मला सांगितल्या तेव्हा मला फार वाईट वाटले. नगरपालिका, विधानसभा किंवा इतर निवडणुकांचे निवडणूक प्रभारी म्हणून आम्ही अनेकदा सुरतला जायचो आणि तिथला विकास पाहायचो, तेव्हापासून आमच्यात नैराश्याची भावना वाढू लागली. पक्षाने दोनदा माझा बायोडेटा घेतला होता, मी खूप शांत होते, कारण भट्ट यांची अकार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी १० वर्षे पुरेसा आहेत हे मला समजले होते, असंही त्या म्हणाल्या.

भाजपा तळागाळातील कार्यकर्त्यांनाही कठोर परिश्रम करायला लावते – ज्योती

उमेदवार भट्ट आणि तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी असता तर तुम्ही पद सोडले असते का? या प्रश्नाला उत्तर देताना ज्योती म्हणाल्या, “मला उमेदवारी मिळाली नसती किंवा दुसरा उमेदवार असता तर मी पद सोडले नसते. मला महापौरपद (डिसेंबर २०१० ते २०१३ च्या मध्यापर्यंत) देण्यात आले, कारण मी सुशिक्षित, तरुणी होते आणि माझा पूर्ण वेळ पक्षाला देत होते. जो परफॉर्म करत नाही, त्याला तुम्ही का निवडून देता? वडोदरात नेत्यांची कमतरता नाही. पक्षाला नवीन चेहऱ्यांची गरज आहे, जर तुम्ही त्याच लोकांना उमेदवारी देत राहिलात तर तरुण पिढीला आपण पक्षात काय करतोय हा प्रश्न पडेल, असंही त्या म्हणाल्यात. पक्ष अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना २४X७ मेहनत करायला लावतो. त्यांना स्वतःची सर्व कामे बाजूला ठेवून पार्टीच्या फोन कॉल घ्यावे लागतात. तुमच्या निर्णयाची माहिती तुम्ही पक्षात प्रथम कोणाला दिली, त्यावर त्या म्हणाल्या की, मी (सीआर) पाटील साहेब आणि (भाजपा प्रदेश सरचिटणीस) रत्नाकरजी यांच्याशी पहिल्यांदा बोलले. दोघांनीही माझ्या कॉलला उत्तर दिले, पाटील यांनी विजय शाह (वडोदरा शहर अध्यक्ष) आणि बाळू शुक्ला (आमदार रावपुरा आणि विधानसभेतील भाजपाचे मुख्य व्हीप) यांना माझ्याशी बोलण्यासाठी पाठवले, पण मला माहीत होते की ते तिथे औपचारिकतेसाठी आले होते आणि त्यांना मी तिथे राहावे, असे वाटत नव्हते.

हेही वाचाः कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील युवराजांनंतर शाहू महाराज निवडणूक आखाड्यात

“भाजपा नेते बोलायला घाबरतात”

भाजपाचे नेते बोलायला घाबरतात असे तुम्ही का म्हणालात? प्रत्युत्तरात ज्योती म्हणाल्या की, “प्रत्येकाचा इतका अपमान केला जात आहे की ते बोलायला घाबरतात. तुम्हाला एक तर रांगेत उभे राहावे लागेल किंवा निलंबित व्हावे लागेल. पक्षांतरामुळे पक्षाची विचारधारा धोक्यात आली आहे. आज भाजपाची अवस्था एका मोठ्या डायनासोरसारखी झाली आहे, ज्याला आपलीच शेपूट चिरडली जात असल्याचं समजत नाही आहे. या विशाल शरीरावरील शेपटीला झालेल्या जखमेची वेदना मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागतो,” असंही त्या म्हणाल्या. रंजन भट्ट यांच्या दोन्ही कार्यकाळात तुम्ही वडोदरात विकास झाला नसल्याबद्दल बोललात, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? मी नेहमीच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उत्सुक होते, पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज लाइन अनेकदा एकमेकांमध्ये मिसळतात. वडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशन विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, ते रस्ता बांधल्यानंतर आणि दुरुस्त केल्यानंतर पाइपलाइनचे जाळे टाकतात. आम्हाला वडोदरा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ हवे आहे, जे झाले नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ जलदगतीने पूर्ण करण्याची आणि वडोदराहून अधिक प्रवासी मिळवण्याची दृष्टी आमच्याकडे का नाही? वडोदराला एम्स का नाही मिळाले? केंद्र सरकार सर्व काही देण्यास तयार आहे, परंतु इथल्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी असली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

भाजपाच्या शहर युनिटवर अनेकदा वडोदरा महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप होतो. खरंच ते हस्तक्षेप करतात का? याला उत्तर देताना ज्योती पंड्या म्हणाल्या, “ हो, खूप ढवळाढवळ करतात हे खरे आहे. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी सूचना देऊ लागले तर सगळे कसे पाळणार? आमच्या घरातही प्रत्येक सदस्य घरकाम करणाऱ्यांना सूचना देत नाही. काही नेत्यांमध्ये साक्षरता नसते. नेत्यांमध्ये दूरदृष्टी आणि नि:स्वार्थीपणाचा अभाव असतो. ते केवळ आपला स्वार्थ आणि सत्तेसाठी काम करीत आहेत. कोणतीही सामूहिक विचारधारा नाही, असंही त्यांनी अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपक्ष निवडणूक लढवू शकता का?

अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ज्योती म्हणाल्या की, “शक्यता जास्त आहेत, पण सध्या मी काहीही करू शकत नाही. दर मिनिटाला परिस्थिती बदलत आहे आणि बरेच लोक माझ्याशी संपर्क साधत आहेत. हे भयावह चित्र आहे, कारण पक्षाच्या पाठिंब्याशिवाय मी निवडणूक कशी लढवणार? माझी इच्छा आहे आणि जर मला चांगला पाठिंबा मिळाला तर मी निवडणूक लढवू शकेन. वडोदरातील लोकांनी मला काही करायला सांगितले, तर मी ते करेन. “सध्या मी कठोर परिश्रम करण्यावर ७० टक्के लक्ष केंद्रित केले आहे,” असंही त्यांनी अधोरेखित केले.