Operation Sindoor Congress vs BJP : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पनामा दौऱ्यावर असताना थरूर यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करून केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. यावरून काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील काही नेते थरूर यांच्यावर उघडपणे टीका करताना दिसून येत आहेत.

भाजपाकडून काँग्रेसच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह

दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांचा आधार घेऊन त्यांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. पाकिस्तानविरोधातील या ऑपरेशनच्या यशाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुढाकार घेत आहेत. बिहार, गुजरात व त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधानांनी देशातून दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असं आश्वासन जनतेला दिलं आहे.

भाजपाच्या एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, “२०१९ मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ऑपरेशन सिंदूरनंतर ते अशी चूक करणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं; पण राहुल गांधींनी भारताच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं करून काँग्रेसला संकटाच्या छायेत टाकलं आहे. देशावरील संकटाच्यावेळी विरोधकांनी एकजुटता दाखवायला हवी होती. योग्य वेळ व प्रभावी मुद्द्यांना हाताशी धरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारायला हवे होते; पण काँग्रेसला त्यात अपयश आलं.”

आणखी वाचा : Congress Government : अधिकाऱ्याच्या कथित आत्महत्येमुळं काँग्रेसचं सरकार अडचणीत?

पंतप्रधान मोदींचा टीकाकारांकडे कानाडोळा?

भारताने पाकिस्तानला कसे गुडघे टेकायला लावले याचा उल्लेख पंतप्रधान मोदी हे त्यांच्या भाषणांमधून करताना दिसून येत आहेत. विशेष बाब म्हणजे, विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेकडे पंतप्रधानांनी कानाडोळा केला आहे. आपल्या भाषांमध्ये त्यांनी काँग्रेसचा उल्लेख करणं टाळलं आहे. २७ मे रोजी गुजरातमधील गांधीनगर येथील सभेत पंतप्रधानांनी फक्त काँग्रेसचा एकदाच उल्लेख केला होता. “सरदार वल्लभभाई पटेल यांना १९४७-४८ मध्ये जम्मू आणि काश्मीरवरील आक्रमणाच्या वेळी थांबवले गेले नसते, तर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (PoK) आज भारतात असता, असं ते म्हणाले होते. इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमधील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला असून विरोधकांनी आता पुरावे मागू नये, असा टोलाही पंतप्रधानांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला होता.

माझ्या नसांमधून रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतं, असंही पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले. यापुढे दहशतवादी कारवाया केल्यास भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. तसेच पाकिस्तानबरोबर कोणताही व्यापार अथवा चर्चा केली जाणार नाही. जर चर्चा झालीच तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष पाकिस्तानविरोधातील कठोर कारवाईसाठी एकत्र उभा राहिला, असंही ते म्हणाले होते.

भाजपाचं काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपाच्या काही नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेसने शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपाचे नेते त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत आतापर्यंत मौन पाळले होते, मात्र त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर टीका करण्याचा निर्णय घेतल्यापासून हा वाद अधिक तीव्र झाला आहे. राहुल गांधींनी आरोप केला की, जयशंकर यांच्या विधानावरून असे सूचित होते की भारताने हल्ला करण्यापूर्वीच पाकिस्तानला माहिती दिली होती. पाकिस्तानला आधीच माहिती मिळाल्यामुळे भारताला किती विमानं गमावावी लागली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा : ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सर्वपक्षीय एकत्र येत असताना काँग्रेसचे हात बांधलेले का आहेत?

काँग्रेस खरंच सरकाच्या पाठिशी आहे का?

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्यावर आपली परखड मते मांडली आणि पाकिस्ताचे खबरी म्हणत त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लक्ष्य केलं. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्टीकरण देत सांगितले की. काँग्रेसकडून जयशंकर यांच्या विधानांचे चुकीचे अर्थ लावले जात आहेत. दहशतवादविरोधी लढ्यात काँग्रेस खरंच सरकाबरोबर आहे का? असे प्रश्नही भाजपा नेत्यांनी उपस्थित केले. “ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे, सरकारने कुठेही ‘शस्त्रसंधी’ हा शब्द स्पष्टपणे वापरलेला नाही. अशा ऑपरेशनच्या दरम्यान जर तुम्ही प्रश्न उपस्थित केले, तर तुमच्या हेतूबाबत शंका निर्माण होतात,” अशी टीका भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेस नेत्यांवर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमध्ये फूट?

दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केल्यामुळे भाजपाच्या नेत्याला विरोधकांवर टीका करण्याची आणखीच संधी मिळाली. थरूर यांनी मोदी सरकारच्या दहशतवादविरोधी भूमिकेचं मुद्देसूद समर्थन केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे “भाजपाचे सुपर प्रवक्ते” होण्यासाठी पात्र आहेत, अशी विखारी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “काँग्रेस पक्षाला नेमकं काय हवंय आणि त्यांना देशाची किती खरंच काळजी आहे का? भारतीय खासदारांनी परदेशात जाऊन भारत आणि भारताच्या पंतप्रधानांविरुद्ध बोललं पाहिजे का? राजकीय मतभेदांचीही एक मर्यादा असते,” असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.