बिहारमध्ये राजकीय हालचालींना अचनाक वेग आला आहे. कारण मकरसंक्रांत झाल्यावर बिहारच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार या शक्यता वर्तवल्या जात आहेत. याचं कारण आहे बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांचं एक वक्तव्य. रामचरितमानसबाबत चंद्रशेखर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून भाजपाने टीका करण्यास सुरूवात केली आहे. हे सगळं प्रकरण ताजं असतानाच जदयूनेह शिक्षण मंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे महागठबंधन असलं तरीही ऑल इज नॉट वेल अशी स्थिती झाल्याचं दिसतं आहे.

भाजपा खासदार प्रदीप सिंह यांनी काय म्हटलं आहे?


भाजपा खासदार प्रदीप सिंह यांनी हा दावा केला आहे की बिहारमध्ये महागठबंधन झालं असलं तरीही जदयूचे आमदार आणि खासदार खुश नाहीत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही घोषणा केली होती की २०२५ मध्ये महागठबंधनचं नेतृत्त्व तेजस्वी यादव करतील. या घोषणेमुळे अनेकजण नाराज झाले आहेत. या घोषणेनंतर अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. जदयूमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे थोडीशी वाट बघा.. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखाच खेळ पाहण्यास मिळेल. मी फक्त राजकीय भाष्य करत नाही मला पूर्ण विश्वास आहे ज्याविषयी मी बोलतो आहे. मात्र हे काय होणार आहे याचा खुलासा मी करणार नाही असंही प्रदीप सिंह यांनी म्हटलं आहे. वेळ आल्यानंतर सगळं सगळ्यांच्या समोर येईल असंही त्यांनी सांगितलं.

जून महिन्यात महाराष्ट्रात काय झालं?

मागच्या वर्षी जून २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असं सांगत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीला १५ ते १८ आमदार होते. त्यानंतर ही आमदारांची संख्या ४० वर गेली. तर अपक्ष १० आमदारही शिंदे गटात आले. याचा परिणाम असा झाला की २९ जूनला महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ३० जूनला महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आलं. आता असाच सत्तेचा खेळ बिहारमध्येही होणार आहे असा दावा भाजपा खासदाराने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून महिन्यात महाराष्ट्रात जो प्रयोग झाला त्यानंतर बिहारमध्ये काय घडलं होतं?

जून महिन्यात जेव्हा महाराष्ट्रात सत्ताबदल झाला त्यानंतर बिहारमध्येही नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडली. त्यांनी राजदसोबत जात महागठबंधनच्या मदतीने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. भाजपासाठी हा झटका होता. मात्र आता सहा महिन्यांनी बिहारमध्ये असाच प्रयोग होणार आहे असं भाजपा खासदाराने सांगितलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.