संतोष प्रधान

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. गेल्या दोन महिन्यांतील त्यांची मराठवाड्यातील ही तिसरी सभा आहे. मराठवाड्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना एवढे आकर्षण का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंद्रशेखर राव यांची मराठड्ड्यातील ही तिसरी सभा आहे. पहिली सभा नांदेडमध्ये झाली होती. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातीलच लोहा येथे सभा झाली. तिसरी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज होत आहे.

चंद्रशेखर राव यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील दोन जाहीर सभांमध्ये तेलंगणा सरकारच्या वतीने शेतकरी आणि दलित समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘रयतू बंधू’ आणि ‘दलित बंधू’ या दोन योजनांचा प्रामुख्याने उल्लेख केला होता. तसेच राज्यात ही योजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांसाठी केसीआर सरकारच्या वतीने विविध निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना भारत राष्ट्र समितीचे आकर्षण वाटू लागले आहे.

हेही वाचा >>> येडियुरप्पांचे वारसदार बोम्मईंना विरोधकांच्या आरोपांची सर्वाधिक झळ

भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील तेगुलू भाषकांचा पक्ष आहे. यातूनच चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या सीमेवरील तेगुलू बहुल भागांवर लक्ष केंद्रित केले. चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या वर्षाअखेर होणाऱ्या तेलंगणातील विधानसभा निवडणुकीनंतर पुत्र के. रामाराव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवून स्वत:ला राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्णा करण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. तेलंगणानंतर त्यांनी महाराष्ट्र व विशेषत: मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह विविध छोटेमोठे पक्ष असताना भारत राष्ट् समितीचा पर्याय कितपत स्वीकारला जाईल, याबाबत साशंकताच आहे. पण सध्या तरी चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे चंद्रशेखर राव यांनी शेजारील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही. तेथे त्यांच्या पक्षाने देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा जाहीर केला आहे.