नागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत कधीकाळी देशात पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नावलौकिक मिळवलेले नागपूर शहर आता या क्षेत्रात मागे पडले आहे. वस्त्या-वस्त्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वसामान्य नागपूरकर वैतागले आहेत, मात्र त्यांचा वैताग गांभीर्याने घेतो कोण? , स्वच्छता झाली नाही तरी ते कर भरतातच. म्हणूनच ते दुर्लक्षित आहेत, मात्र एखाद्या आमदाराने वैताग व्यक्त केला आणि तोही सत्ताधारी पक्षाचा, मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत मर्जीतला असेल तर त्याचे तरी महापालिका प्रशासन ऐकेल का ? असा प्रश्न आता भाजप आमदाराने स्वच्छतेबाबत व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीनंतर उपस्थित केला जात आहे.
संदीप जोशी हे या आमदाराचे नाव
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना शहर स्वच्छता अभियानाचा पहिला पुरस्कार नागपूरमहापालिकेने पटकावला होता. सुंदर शहर, स्वच्छ शहर, हिरवे शहर म्हणून नागपूरचा नावलौकिक होता. काळ बदलला, महापालिकेतील सत्ताही बदलली तशीच ती केंद्रात आणि राज्यातही बदलली. या शहराचा जणू कायापालटच झाला. चांगल्या अर्थानेही झाला आणि शहराला नरक करण्याच्या अंगानेही झाला. हजारो कोटींच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी बेच्छुट वृक्षतोड झाल्याने हिरवे शहर ही नागपूरची ओळख इतिहास जमा झाली, स्वच्छतेबाबत अनेक उपायोजना करूनही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दांडगाईच्या धोरणामुळे ती ही फसली. परिणामी स्वच्छता .मानांकनातही शहर मागे पडले. मागील तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत तर स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला. नागरिकांनी ओरड केली, पण ती अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहचलीच नाही. परिणामी जागोजागी कचरयाचे ढिग साचले. स्वच्छ वस्त्या अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिममधील वस्त्या अत्यंत घाणेरड्या वाटायला लागल्या, सीमावर्ती भागातील वस्त्यांबाबत तर बोलायलाच नको कारण स्वच्छता कर्मचारी तेथे जातच नाही. त्यामुळे राज्याची उपराजधानी नागपूरला बकाल रुप आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने कां होईना भाजप आमदार संदीप जोशी यांनी स्वच्छतेचा प्रश्न हाती घेऊन प्रशासनाला खडे बोल सुनावले. राज्यात भाजपचेच सरकार आहे आणि त्याच सरकारच्या अखत्यारित म्हणजे नगरविकास खात्यांतर्गत महापालिकेचा सध्याचा कारभार सुरू आहे. म्हणून जोशी यांची टीका अप्रत्यक्षरित्या त्यांच्याच सरकारवर असली तरी ती लोकांच्या प्रश्नांशी निगडीत असल्याने लोकप्रतिनिधी म्हणुून त्यांनी मांडलेले मुद्दे सर्वसामान्य नागपूरकरांच्या मनातील ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या तक्रारीकडे तरी लक्ष घालून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
काय म्हणाले संदीप जोशी
नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातल्या प्रचंड तक्रारी येत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. गटारी तुंबल्या आहे. प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत. जनतेचा आवाज ऐकणारा एकही अधिकारी नाही काय? नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा भगवान भरोसे सुरू आहे काय?, असा संतप्त सवाल आमदार संदीप जोशी यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केला आहे. रामकृष्ण नगर, धंतोली, जागृती कॉलनी, बजाज नगर, सुरेंद्रनगर आदी भागांमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेतले. या संवादांत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर साफसफाईसंदर्भातील तक्रारी केल्या. आठ आठ, दहा पंधरा दिवस घरासमोर साफसफाई होत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. जनसंवाद कार्यक्रमातून आमदार जोशी यांचा हात पकडून नेत काहींनी परिसरातील झाडाझुडपांचे ढिगारे व कचऱ्याचे ढीग दाखवले. आमदारांचा हात पकडुन नेण्यापर्यंत नागरिकांचा संताप पोचला असल्याचे आमदार जोशी यांनी म्हटले आहे.
अधिकारी बेजबाबदार
झोनल आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत कोणत्याही पातळीवर जबाबदारीचे भान राहिलेले नाही. अनेक सफाई कर्मचारी आपली ड्युटी दुसऱ्यांना ‘सबलेट’ करून खासगी कामांमध्ये गुंतले आहेत. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही यामुळे शहरात साफसफाईचे तीन तेरा वाजले आहेत, असा दावा जोशी यांनी केला आहे.