Congress Sonia Gandhi on Israel Iran War : इस्रायल व इराण यांच्यातील निर्माण झालेल्या तणावाला १० दिवस झाले असून हा वाद विकोपाला जात असल्याचं दिसून येत आहे. इस्रायलकडून ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणवर सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. त्यांच्या या हल्ल्याला इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पश्चिम आशियातल्या या तणावाबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. सोनिया गांधी यांनी नुकताच ‘दी हिंदू’ या दैनिकात संपादकीय लेख लिहिला. हा लेख प्रसिद्ध होताच राजकीय वादंग उठला असून भाजपाचे नेते काँग्रेसला लक्ष्य करीत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी या लेखात नेमकं काय म्हटलंय? ते जाणून घेऊ…
सोनिया गांधी यांनी इस्रायल-इराण युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. आपल्या लेखातून त्यांनी गाझामधील विनाश आणि इस्रायलकडून इराणवर होणाऱ्या कथित एकतर्फी हल्ल्याबाबत केंद्र सरकारच्या मौनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गाझा व इराणमधील विध्वंसावर नवी दिल्लीने शांत बसणं हे म्हणजे आपण आपल्या मूल्यांचा त्याग करणं आहे. इराण हा भारताचा पारंपरिक मित्र असून अशा संकटाच्या वेळी भारताने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवं होतं”, असं सोनिया गांधी यांनी त्यांच्या लेखातून म्हटलं आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी या लेखातून केवळ इराण नव्हे, तर पॅलेस्टाईनबाबतही पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रियांका गांधींनी दिले होते पॅलेस्टाईनला समर्थन
विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील इस्रायल-पॅलेस्टाईन वादावर भारताने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली होती. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू असताना प्रियांका यांनी सभागृहात नेलेली पॅलेस्टाईनसमर्थक संदेश असलेली पिशवी संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. भाजपाने त्यांच्या या कृतीवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा मुद्दा प्रियांका गांधी फक्त अल्पसंख्यांक मतांसाठी लावून धरत असल्याचा आरोप भाजपाच्या खासदारांनी केला होता.
आणखी वाचा : Police Bharti Cancel : विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेली पोलीस भरती रद्द; भाजपाने असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधींनी त्यांच्या लेखामध्ये काय म्हटलंय?
- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘भारताच्या भूमिकेला अजूनही उशीर झालेला नाही’ या शीर्षकासह एक लेख लिहिला आहे.
- या लेखातून त्यांनी इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून समर्थन केलं आहे.
- सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या लेखात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली आहे.
- इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वसंक मार्ग निवडल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.
- गाझामधील विध्वंस व इराणमध्ये विनाकारण होत असलेले हल्ले पाहूनही नवी दिल्लीने त्यावरील मौन सोडलं पाहिजे, असं गांधी यांनी म्हटलं आहे.
- या संघर्षावर दिल्लीतील नेत्यांनी मौन बाळगणं म्हणजे आपल्या नैतिक व राजनैतिक परंपरांचा त्याग करत आपली मूल्ये सोडल्याचं दिसतंय, अशी टीका सोनिया यांनी केली आहे.
- भारताने या संघर्षावर स्पष्टपणे बोलायला हवं, तसंच जबाबदारीने वागून पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपा नेत्यांनी केलं सोनिया गांधींना लक्ष्य
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विधानावर टीका केली आहे. “माझ्या मते सोनिया गांधींना परराष्ट्र धोरणाची समज नाही. कदाचित त्यांना या गोष्टीची माहिती नसेल किंवा त्या जाणीवपूर्वक एका विशिष्ट गटाला लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं राम कदम यांनी म्हटलं आहे. “भारताची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे – आपण नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक कूटनीतीत नेहमीच सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचा फक्त मुस्लीम मतदारांवर डोळा – आरपी सिंह
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता आरपी सिंह यांनीही सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, मला असं वाटतयं की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तमानपत्रे वाचणं सोडून दिलं आहे किंवा त्यांच्या जवळील व्यक्ती त्यांना चुकीचे माहिती देत आहेत. इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष थांबायला हवा, असं भारत सरकारचं म्हणणं आहे. काँग्रेस पक्ष हा कूटनीतीच्या मुद्द्याकडेही राजकीय मुद्दा म्हणूनच बघत आहे. त्यांचा फक्त मुस्लिमांच्या मतांवर डोळा आहे. आगामी काळात बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने तेथील मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहे. त्यांनी हे मतांचं राजकारण करणं सोडून द्यावं”, असं आरपी सिंह यांनी म्हटलं आहे.
इराण खरोखरचं भारताचा मित्र आहे का?
सोनिया गांधी यांनी त्यांच्या लेखात इराणला भारताचा जुना मित्र म्हटले असले तरी, भारत-इराण संबंध कायमच सौहार्दपूर्ण राहिलेले नाहीत. यापूर्वी काही प्रसंगांमध्ये इराणने भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केल्याने द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. २०२४ मध्ये, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताचा उल्लेख करत टीका केली होती. “इस्लामचे शत्रू नेहमीच आपल्याला इस्लामी उमाह या सामूहिक ओळखीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर म्यानमार, गाझा किंवा भारतातील मुस्लिमांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं तर स्वतःला खरे मुस्लीम म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही,” असं खामेनी म्हणाले होते.
हेही वाचा : हमासला शस्त्रे देणाऱ्या इराणी कमांडरचा इस्रायलकडून खात्मा; कोण होते सईद इजादी?
कलम ३७० हटविल्यानंतर इराणकडून निषेध
दरम्यान, खामेनी यांनी केलेल्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला होता आणि ते चुकीची माहिती देत असल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले होते. इतकेच नाही तर, केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर इराणने या निर्णयावर उघडपणे टीका केली होती. हे प्रकरण भारताच्या अंतर्गत कारभाराशी संबंधित असूनही, त्यावर मत व्यक्त करून इराणने भारताला डिवचण्याचं काम केलं होतं. या पार्श्वभूमीवर, इराणवर “सदैव विश्वासू मित्र” असा एकपक्षीय शिक्का मारणे पूर्णपणे योग्य ठरणार नाही, असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
१९९४ मध्ये इराणने घेतली होती भारताची बाजू
भारत आणि इराण यांच्यातील संबंध नेहमीच स्थिर नसून बदलते राहिले आहेत. १९९४ मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेमध्ये काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांवरून भारतावर निर्बंध लावण्याबाबत चर्चा सुरू होती, तेव्हा इराणने भारताची बाजू घेत त्याला मोठा दिलासा दिला होता. सोनिया गांधी यांनी त्यांच्या लेखात याच घटनेचा संदर्भ घेत भारताने हे जुने उपकार विसरायला नको हवे होते अशी टीका केली. त्यांच्या मते, भारताने अलीकडच्या काळात पश्चिम राष्ट्रे, अमेरिका आणि इस्रायलशी जास्त जवळीक साधल्यामुळे इराणचा राग ओढवून घेतला आहे. विशेषतः, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या निवेदनाला भारताने पाठिंबा दिला नाही, ज्यात तेहरानवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता.