अकोला : गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हा गंभीर मुद्दा उचलून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपसह सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. शिवसेनेने काढलेल्या मूक मोर्चाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून शिवसेनेने लक्ष वेधून घेत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले.

अकोला जिल्हा अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे. हत्या, अपहरण, अत्याचार, चोरी, दरोड्याचा प्रयत्न आदी घटनांमध्ये वाढ झाली. पश्चिम विदर्भातील मध्यवर्ती ठिकाण व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असल्याने शहरात बाहेरगावावरून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. शहरात खासगी शिकवणी वर्गाचे मोठे जाळे आहे. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. शिकवणी वर्गासाठी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही टवाळखोर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकारदेखील सुरू असतो. यातूनच नववर्षाच्या प्रारंभी निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला. अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अकोल्यात शिक्षणासाठी आलेला जळगाव जामोद येथील विशाल धोटे या १६ वर्षीय मुलाची मद्यपी युवकांनी धाक दाखवण्याच्या उद्देशातून चाकूने निर्घृण हत्या केली. या गंभीर घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून संतापाची लाट पसरली.

हेही वाचा – रावसाहेब दानवे यांना अनुकूल वातावरण, विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध सुरू

अकोल्यातील गुन्हेगारीवरून समाजात पसरलेला असंतोष जाणून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागणीसह शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चाला शिकवणी वर्ग संचालकांचा पाठिंबा होता. मूक मोर्चात हजारो विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकदेखील सहभागी झाल्याने त्याला व्यापक स्वरूप आले होते. मोर्चा काढून शिवसेनेने सर्वसामान्यांचा प्रश्न उचलल्याने त्याला जनसमर्थन मिळाल्याचे दिसून आले.

शहरातील विद्यार्थी हत्येच्या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाने पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला असला तरी अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले गेले. भाजपने या प्रकरणात राजकारण न करण्याचे आवाहन केले. अकोला हा भाजपचा गड म्हणून ओळखल्या जातो. गेल्या दोन-तीन दशकांपासून येथील आमदार, खासदार भाजपचे आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: १३ महिने अकोल्याचे पालकमंत्री होते. तरी देखील शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन समितीच्या बैठकीमध्येसुद्धा हा मुद्दा गाजला होता. शहरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असताना शिवसेनेने निवडणुकांच्या तोंडावर हा विषय उचलून धरला. गुन्हेगारी घटनांमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून त्यावर आळा बसण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा – महिला मतपेढीच्या बांधणीसाठी भाजपकडून शक्तीवंदन दालन !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोल्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच अवघ्या १४ महिन्यांमध्ये त्यांचे बदली आदेश निघाले. ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर काही लोकप्रतिनिधी नाराज झाल्याने राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. वाशीम येथून बदली झाल्यावर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या बच्चन सिंग यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यांच्या कार्यकाळात तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जाते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.