माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्याशी मैत्री, तर माजी मंत्री असलेले सख्खे भाऊ रामदास कदम यांच्याशी दुष्मनी, या दोन्हीमुळे सदानंद कदम ‘ईडी’च्या कचाट्यात सापडले आहेत.

या संदर्भात थोडा इतिहास पाहिला तर १९९० पूर्वी रामदास कदम आणि सदानंद उर्फ आप्पा कदम या सख्ख्या भावांचे एकत्र कुटुंब मुंबईला कांदिवली भागात राहत होते. रामदासभाई शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून राजकीय बस्तान बसवत असताना सदानंद राजकारणापासून दूर राहून टेंपोद्वारे मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते. १९९३-९४ मध्ये मुंबईत केबलचा व्यवसाय जोरात सुरू झाल्यानंतर सदानंद कदम ‘साई केबल’च्या माध्यमातून त्या व्यवसायात शिरले. १९९५ मध्ये राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम मंत्री झाले. त्याचाही त्यांना या व्यवसायातील ‘वॉर’ मिटवून जम बसवण्यासाठी उपयोग झाला. याच काळात अनिल परब यांच्याशी त्यांची सलगी वाढू लागली. पण पुढे, २००३-०४ मध्ये खेड एसटी स्टँडच्या बाजूला सदानंद कदमांनी अनिकेत शॉपिंग सेंटर हे भव्य, तीन मजली व्यवसाय केंद्र सुरू केलं. याच सुमारास सख्खा भाऊ असलेल्या रामदासभाईंशी काही कारणांनी खटके उडू लागले आणि दोन भावांमधलं अंतर वाढत गेलं.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव वेगळी चूल मांडणार; काँग्रेस, बसपा नव्हे तर छोट्या पक्षांशी करणार युती!

शॉपिंग सेंटरपाठोपाठ भरणे नाका येथील ‘आमराई मोटेल’ हे हॉटेल सदानंद कदमांनी विकत घेऊन मोठं रिसॉर्ट बांधलं. अशा प्रकारे खेड परिसरातील मोक्याच्या जागांच्या खरेदी-विक्री व्यवहारात जम बसवत असताना येथील ५-६ प्रमुख व्यावसायिक सदानंद कदम यांचे भागीदार बनले. पण काळाच्या ओघात यापैकी बहुतेकांशी त्यांचं वितुष्ट आलं. अगदी कोर्ट-कचेऱ्या झाल्या. शॉपिंग सेंटरची वाटणी झाली. मात्र अनिल परब यांच्याशी सख्य आणि व्यावसायिक संबंध कायम राहिले. यातूनच सध्याच्या वादग्रस्त साई रिसॉर्टचा व्यवहार झाला. पण पुढे हा विषय अडचणीचा होऊ लागल्यावर परबांनी, गेल्या सुमारे पंचवीस वर्षांचे व्यावसायिक मित्र सदानंद कदम यांच्या गळ्यात तो घातला आणि तेच आज त्यांच्या ‘गलेकी हड्डी’ बनलं आहे. या संदर्भात आणखी एक ‘अंदरकी बात’ म्हणजे, हा विषय चव्हाट्यावर येण्यासाठी भाजपाचे बोलभांड माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबरच स्थानिक वाळू व्यावसायिकांशी सदानंद कदमांनी घेतलेला पंगा जास्त नडला, अशीही माहिती आहे.

हेही वाचा – चर्चेतील चेहरा.. देवेंद्र फडणवीसच सरकारचा खरा चेहरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे या सगळ्या व्यावसायिक भानगडी चालू असताना रामदासभाईंशी असलेलं वितुष्ट सदानंद कदम यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने संपुष्टात आले होते. दोन्ही कुटुंबांमध्ये येणे जाणे सुरू झाले होते. भरणे नाक्यावरच्या रिसॉर्टमध्ये सदानंद कदम यांनी सुरू केलेल्या क्लब हाऊसच्या उद्घाटनप्रसंगी रामदासभाईंचे आमदार झालेले चिरंजीव योगेश हेही उपस्थित होते. पण नंतर अनिल परब यांच्या संदर्भात रामदास कदम यांच्या तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामागे अन्य काही राजकीय विरोधकांसह सदानंद कदम यांचाही हात असल्याचा संशयातून या दोन भावांमध्ये पुन्हा इतके वितुष्ट निर्माण झाले की, आता त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळेच कदम पिता-पुत्रांचे तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला त्या कार्यक्रमाला सदानंद कदम यांनी भरपूर ‘रसद’ पुरवल्याचा आरोप आहे आणि म्हणून तो झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत त्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावं लागलं, अशी सार्वत्रिक चर्चा आहे.