हरियाणातील नूह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै) दोन गटांत सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन हिंसाचार भडकला होता. तेव्हापासून येथे तणावाचे वातावरण होते. नूह जिल्ह्यातील हिंसाचार थांबवण्यासाठी तेथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या यात्रेला काही काळासाठी थांबवण्यात आले होते. दरम्यान, नूह जिल्ह्यातील पलवल येथे रविवारी (१३ ऑगस्ट) महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीत भाजपाचे आमदार संजय सिंह यांनी हजेरी लावली असून ही विश्व हिंदू परिषदेची यात्रा २८ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नूह जिल्ह्यात हिंसाचा भडकल्यानंतर ‘मी अगोदर हिंदू आहे आणि नंतर आमदार,’ असे विधान संजय सिंह यांनी केले होते.

हिंदूंचे हक्क आणि धर्माच्या रक्षणासाठी वेळोवेळी घेतली भूमिका

या महापंचायतीत विश्व हिंदू परिषदेची यात्रा येत्या २८ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महापंचायीत संजय सिंह यांनी सोहना या भागाचे प्रतिनिधित्व केले. या महापंचायतीत राज्य बजरंग दलाचे निमंत्रक भारत भूषण, विश्व हिंदू परिषदेचे समाजमाध्यम प्रमुख अनुराग कुलश्रेष्ठ, पलवलचे माजी आमदार सुभाष चौधरी आणि नूहचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आर्य हेदेखील उपस्थित होते. सिंह यांच्या उपस्थितीबद्दल स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंह यांच्या या भूमिकेत काहीही आश्चर्य नाही. त्यांनी हिंदूंचे हक्क आणि धर्माच्या रक्षणासाठी वेळोवेळी भूमिका घेतली आहे, असे पलवल या भागातील स्थानिक नेत्यांनी सांगितले.

“हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा”

पोलिसांनी या महापंचायतीच्या आयोजनास परवानगी नाकारली होती. मात्र द्वेषपूर्ण भाषण न करणे तसेच कोणतेही शस्त्र न बाळगण्याच्या अटीवर पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली होती. मात्र या महापंचायतीत ‘आम्हाला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा’, ‘पोलिसांनी आम्हाला रोखून दाखवावे’, अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा द्यावा, नूह जिल्हा बरखास्त करावा. त्या भागात गोहत्येवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली. नूह येथील हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवावा, अशीही मागणी या महापंचायतीत करण्यात आली.

२०१९ साली पहिल्यांदा आमदार

दरम्यान, संजय सिंह माजी राज्यमंत्री कंवर सूरज पाल सिंह यांचे पुत्र आहेत. सिंह यांचा मेवात प्रदेशावर मोठा राजकीय प्रभाव आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंचपदापासून केलेली आहे. २०१९ साली ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर जमीन विकास बँकेचे संचालक, मेवात विकास मंडळ आणि राज्य खादी ग्राम उद्योग मंडळाचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. यासह गोरक्षक संघटनांच्या परिषदांनाही ते वेळोवेळी उपस्थित राहिलेले आहेत.

सिंह २५ एकर शेतीचे मालक

२०१९ साली त्यांनी जननायक जनता पार्टीचे रोहताश सिंह यांचा १२ हजार ४०० मतांनी पराभव केला होता. भाजपाचे नेते तेजपाल तन्वर यांचा २०१४ साली विजय झाला होता. मात्र त्यांना डावलून भाजपाने संजय सिंह यांना उमेदवारी दिली होती. सिंह यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे ते २५ एकर शेतजमिनीचे मालक आहेत. तसेच त्यांच्याकडे ६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी अगोदर हिंदू आहे त्यानंतर आमदार”

नूह जिह्यात हिंसाचाराची घटना घडल्यानंतर ३१ जुलै रोजी सिंह यांनी महत्त्वाचे विधान केले होते. “मी माझ्या मतदारसंघातील लोकांचे संरक्षण करावे. माझ्या मतदारसंघात शांतता कायम ठेवावी यासाठी मला लोकांनी निवडून दिलेले आहे. मी जर त्यांचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल तर मला आमदारपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मी अगोदर हिंदू आहे त्यानंतर एक आमदार आहे. माझ्या लोकांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे,” असे संजय सिंह म्हणाले होते.