काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. काँग्रेस सोडताना संजय निरुपम यांनीसुद्धा केसी वेणुगोपाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पक्षात सत्तेची ५ केंद्रे आहेत. आज सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल हे काँग्रेसमध्ये सत्ताकेंद्र झाले आहेत, असंही काँग्रेस पक्षावर टीका करताना संजय निरुपम म्हणाले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या केरळच्या नेत्या पद्मजा वेणुगोपाल यांनीही आज आमचं ऐकायला पक्षात कुणीच उरलं नसल्याचं म्हटलं आहे. याआधीही अनेक काँग्रेस नेत्यांनी वेणुगोपाल हे काँग्रेसच्या सत्तेचे केंद्र असल्याचे वर्णन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज केसी वेणुगोपाल हे पक्षाचे डोळे आणि कान आहेत, असे काँग्रेसमधील नेते खासगीत बोलतात. दिवंगत अहमद पटेल हे सोनिया गांधी यांच्यासाठी जेवढे महत्त्वाचे होते. तेवढेच महत्त्वाचे केसी वेणुगोपाल हे राहुल गांधींसाठी आहेत. काँग्रेसमध्ये इतर नेत्यांच्या प्रवेशावरही वेणुगोपाल यांनी नियंत्रण ठेवल्याचा आरोपही त्यांच्यावर होत असतो. वेणुगोपाल १९९१मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आले, जेव्हा केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांचे गुरू करुणाकरन यांनी त्यांना कासारगोडमधून लोकसभेचे तिकीट मिळवून दिले. तेव्हा ते केवळ २८ वर्षांचे होते आणि ते पक्षाच्या विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष होते, परंतु वेणुगोपाल त्यावेळी थोड्या फरकाने निवडणूक हरले.

केसी वेणुगोपाल यांचे राजकारणात पाऊल

१९९५ पर्यंत केसी वेणुगोपाल आणि त्यांचे गुरू करुणाकरन यांच्यात मतभेद झाले. अर्जुन सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्याच्या तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या निर्णयाला करुणाकरन यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता. परंतु अर्जुन सिंग यांना उघडपणे पाठिंबा देताना वेणुगोपाल यांनी करुणाकरन यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. करुणाकरन केरळचे मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९५ साली ए के अँटोनी यांच्या जवळ गेले. त्यावेळी वेणुगोपाल यांनी ए के अँटोनी आणि करुणाकरन यांच्या विरोधात तिसरा गट निर्माण केला होता. या गटात रमेश चेन्निथला, जी कार्तिकेयन आणि एम आय शानवास यांचा समावेश होता. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या गटाने करुणाकरन आणि अँटोनी यांच्या वर्चस्वाशी लढा दिला.

हेही वाचाः वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी

वेणुगोपाल १९९६ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले

वेणुगोपाल पहिल्यांदा १९९६ मध्ये आमदार झाले, नंतर २००१ आणि २००६ मध्ये पुन्हा विजयी झाले. २००४ मध्ये ते ओमन चंडी सरकारमध्ये मंत्री झाले. २००९ पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते आणि पुढच्या दोन वर्षांत ते केंद्रीय राज्यमंत्री झाले. २०१४ मध्ये जेव्हा देशभरातून काँग्रेसचा सफाया झाला, तेव्हा केरळमधून विजयी झालेल्या मूठभर खासदारांमध्ये वेणुगोपाल होते आणि त्यांनी पक्षाचा व्हिप तयार केला होता.

शाळेतील विद्यार्थी दशेपासून त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केले. महाविद्यालयात व्हॉलीबॉल खेळात निपुण होते. तसेच गणित विषयात पदव्युत्तर पदवीधर घेतल्यानंतर कन्नूरच्या हिंसक राजकारणातून ते पुढे आले. काँग्रेस पक्षात निष्ठेला सर्वोच्च स्थान दिले जाते, हे त्यांना माहीत आहे, त्यांनी नेतृत्वाप्रति असलेली निष्ठा बऱ्याच प्रमाणात दाखवून दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

वेणुगोपाल राहुल गांधी यांच्या आवडते

केसी वेणुगोपाल यांनीही आपल्या राजकीय कौशल्याचा पुरेपूर प्रत्यय दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत केरळच्या वायनाडमधील दुसऱ्या जागेवरून लढण्यासाठी त्यांनी राहुल यांना राजी केले, कारण त्यांना उत्तर प्रदेशातील राजकीय वारे अचूकपणे समजले होते, असे त्यांचे विश्वासू सांगतात. आणि झालंसुद्धा असंच काहीसं, राहुल गांधी वायनाडमधून जिंकले आणि अमेठीतून हरले.

स्वच्छ प्रतिमेचे नेते मानले जाणारे केसी वेणुगोपाल यांची अशोक गेहलोत यांच्या जागी राहुल गांधी यांनी एआयसीसी संघटनेचे सरचिटणीस प्रभारी म्हणून निवड केली. त्यानंतर गेहलोत यांना राजस्थानला पाठवले. राहुल यांच्या निर्णयावर सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण वेणुगोपाल यांना संघटना चालवण्याचा आणि देशभरातील पक्ष नेत्यांशी समन्वय निर्माण करण्याचा अनुभव नव्हता, पण वेणुगोपाल यांनी राहुल यांचा विश्वास जिंकला. दोन-तीन वर्षांतच वेणुगोपाल काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आले. पक्षात महत्त्वाची पदे मिळवणे, निवडणुकीची तिकिटे मिळवणे अशा महत्त्वाच्या कामांमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार

काँग्रेसने ८ मार्च रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी ३९ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये केसी वेणुगोपाल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. केरळमधील अलप्पुझा लोकसभा मतदारसंघातून केसी वेणुगोपाल यांना पक्षाने तिकीट दिले आहे. केसी वेणुगोपाल हे आधीच राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. असे असतानाही काँग्रेसने आपल्या ज्येष्ठ नेत्याला लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागील एक प्रमुख कारण असे मानले जाते की, ते २००९ ते २०१४ पर्यंत केरळमधील अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. केसी वेणुगोपाल यांनी या जागेवरून २०१९ ची निवडणूक लढवली नाही आणि २०२० मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. या जागेवरून त्यांनी निवडणूक न लढवल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या हातातून निसटली होती, त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या जागेवरून पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did venugopal become the center of power in congress why are the reasons for the outgoing of congress leaders vrd
First published on: 05-04-2024 at 22:21 IST