बिहारमध्ये होणार्‍या जातनिहाय जनगणनेचे श्रेय घेण्यावरून भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीयुमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपाला शह देण्याच्या प्रयत्नात जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानण्यासाठी शनिवारी बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘आभार यात्रा’ काढली. ही बाब भाजपाला प्रचंड खटकली. या प्रकाराबाबत भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेताना भाजपाचीही भुमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत भाजपाकडून व्यक्त केले जात आहे.

जेडीयुने नितीशकुमार यांचे आभार मानण्यासाठी राज्यातील सर्व ३८ जिल्हा मुख्यालयांमध्ये बॅनर आणि पोस्टर्स लावले. वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीज काढल्या. प्रत्येक जिल्ह्यात एकाचवेळी तीन ते चार तास ही यात्रा सुरू होती. प्रत्येक रॅलीचे नेतृत्व पक्षाचे संबंधित जिल्हाचे अध्यक्ष करत होते.यावेळी जेडीयुच्या  कार्यकर्त्यांनी “नितीश कुमार झिंदाबाद” आणि “जातिय जनगणना पुरे देश में कारवानी होही” अशा घोषणा दिल्या गेल्या. जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी जेडीयुची राजकीय चाल म्हणून या यात्रेकडे पाहिले जात आहे 

जेडीयुचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी ‘संडे एक्सप्रेस’ला सांगितले की, “बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत पुढाकार घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे आभार मानण्याठी राज्यभर रॅलीज काढण्यात आल्या होत्या. या विषयात सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यापासून ते सर्वपक्षीय बैठक बोलावण्यापर्यंत नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या सहमतीने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर २४ तासांच्या आत राज्य मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली”. आमचे नेते नितीश कुमार यांच्यात असलेली कर्तव्याची भावना लोकांना समजणे आवश्यक होते आणि म्हणून पक्षाने रॅली काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय

भाजपचे प्रवक्ते आणि पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस निखिल आनंद म्हणाले की “बिहारमधील जातनिहाय जनगणनानहा राज्य मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे आणि त्यात भाजपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा कोणाचा वैयक्तीक किंवा एका पक्षाचा निर्णय नाही.  २०११ च्या जातनिहाय जनगणनेची चिरफाड होण्यास त्यावेळचे यूपीए सरकारच जबाबदार होते. यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. आम्ही संपूर्णपणे जात जनगणनेला कधीच विरोध केला नाही पण आम्हाला त्याच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीची काळजी आहे.