लातूर : शिवराज पाटील चाकुरकराच्या स्वभावात अघळपघळपणा अजिबात नाही. त्यामुळे त्यांच्या ‘ देवघरा’ समोरची गर्दीही तशी बेताचीच. ग्रामीण भागातून भेटलेला माणूस ‘ शरणार्थ’ असे म्हणायाचा. अर्चना चाकुरकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आणि आता शरर्णार्थ म्हणणाऱ्या माणसांबरोबर ‘ जय श्रीराम’ असेही ऐकू येवू लागले आहे. चाकूरकरांच्या घरासमोरच्या गर्दीचा रंगही बदलला आहे आणि संख्याही वाढली असल्याचे दिसून येत आहे.

२००४ मध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी सलग अकरा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता. निवडणूका आल्या की ‘देवघर’ वर चाकूरकरांच्या चहात्यांची गर्दी असायची. घरचे कार्य असे समजून अनेक जण तन-मन-धनाने कामाला लागत असत. एरवी या बंगल्यावर फारशी गर्दी नसे. २००४ च्या पराभवानंतर गर्दी कमी होत गेली. काँग्रेसची मंडळी निवडणुकीच्या दरम्यान आशीर्वाद घ्यायला बंगल्यावर येत जात. मात्र, अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लातूर येथील त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची मोठी रांग लागली. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग आहे.

हेही वाचा : राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?

तब्बल वीस वर्षानंतर चाकुरकरांच्या घरासमोर तोबा गर्दी दिसून आल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. या गर्दीत पूर्वी बंगल्यावर फेटेवाले त्यात लाल, पांढरे , पिवळे असे फेटे परिधान केलेले , अंगावर धोती अशा मंडळीची गर्दी असायची. आता सर्व प्रकारची मंडळी बंगल्यावर गर्दी करत आहेत. पूर्वी निवडणुकांच्या काळात काँग्रेसचा गमच्या घातलेले कार्यकर्ते असत आता भगवे गमछे घातलेल्या कार्यकर्त्यांची संख्या दिसू लागली आहे. या गर्दीत सर्व प्रकारच्या जाती-धर्माच्या मंडळींची संख्या दिसू लागली आहे. अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडून तातडीने राजकीय लाभ मिळण्याची शक्यता नसतानाही त्यांच्या स्वागताचे फलक शहरभर दिसून येत आहेत. लातूरच्या राजकारणात नवे रंग भरले जाऊ लागले असल्याचे हे लक्षण असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत.