सांगली : सांगली जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न वसंतदादा पाटील यांच्यानंतर आजतागायत अधून मधून डोके वर काढत असतोच. अशा स्थितीत एकमुखी नेतृत्व काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार जयंत पाटील यांनाही सांगलीकरांनी सुरक्षित अंतरावर ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील दुफळी नंतर पुन्हा एकदा आमदार पाटील यांच्या नेतृत्वाबाबत सवाल उपस्थित होऊ लागल्याने पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांना सांगलीत येऊन आमदार पाटील यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन करावे लागले. महापालिका क्षेत्रातील आमदार पाटील यांच्या गटाला ओहटी लागली असल्याचे चित्र असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला गट विस्तार करीत असताना आमदार पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे दिसत आहे. अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये आपला सवतासुभा निर्माण करीत थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर नव्याने निर्माण झालेल्या दादा गटात जिल्ह्यातील आमदार मात्र थोरल्या साहेबांच्या म्हणजे खासदार शरद पवार यांच्या पाठीशी राहिले आहेत. या गटाचे राज्याचे नेतृत्व सध्या इस्लामपूरच्या जयंत पाटलांकडे आहे. नव्याने पक्षाचा विस्तार होण्याऐवजी महापालिका क्षेत्रात गळती लागल्याचेच चित्र असून आमदार पाटील यांचे बिनीचे शिलेदार मुंबईला जाउन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत आहेत. एकेकाळी आमदार पाटील यांच्या शब्दावर महापौर झालेले इद्रिस नायकवडी, दिग्विजय सुर्यवंशी यांनी तर दादा गटात सहभागी झाल्याची अधिकृत घोषणाच केली असून माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह मुदत संपलेल्या महापालिकेतील १५ सदस्यापैकी १४ सदस्य या दादा गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय दोन माजी महापौरही या गटाच्या बरोबर आहेत. हेही वाचा : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विरोधी नेत्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्य यंत्रणा सक्रिय का झाल्या ? जिल्ह्याची राजधानी असलेल्या सांगलीची म्हणजेच महापालिकेची सत्ता मिळवायचीच असा चंग बांधून आमदार पाटील यांनी एकेकाळी भाजपची मदत घेतली. तेथूनच ‘जेजीपी’ म्हणजेच ‘जयंत जनता पार्टी’ असा शब्दप्रयोग सांगलीच्या राजकारणात रूढ झाला. सांगली महापालिकेवर एकेकाळी काँग्रेसच्या मदन पाटील यांचे वर्चस्व होते. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी विकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आला. मात्र, हा प्रयोग शेवटपर्यंत टिकू शकला नाही. महापालिेकेच्या कारभारात भाजपलाही चांगले दिवस जनतेने दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणात भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता शेवटच्या अडीच वर्षात राखता आली नाही. राष्ट्रवादीने काँग्रेसला सोबत घेउन भाजपमध्ये फूट पाडत महापौर पद हस्तगत करीत भाजपला सत्तेवरून पायउतार केले. हेही वाचा : आंध्र प्रदेशमध्ये डॉ. आंबेडकरांचा १२५ फुटी भव्य पुतळा अन् निवडणुकीचे गणित, जगनमोहन यांना दलित मतदार साथ देणार का? आता मात्र, राज्यातील सत्ता महायुतीच्या ताब्यात जाताच सांगलीतही सत्तेची गणिते झपाट्याने बदलत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सांगलीपेक्षा मिरज शहरात अधिक असताना या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना फारसे निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचे गेल्या तीन वर्षापासून दिसत आहे. यातूनच नाराजी नाट्य बळावत चालले. पक्षाच्या पदाधिकार्याविरूध्द अनेक तक्रारी करण्यात आल्या तर पक्ष नेतृत्वाकडून बदल करण्याऐवजी कानाडोळा करणेच अडचणीचे ठरू लागले आहे. यामुळे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात निर्माण झालेल्या नाराजीला आता अजितदादा गटामुळे सत्तेचे घुमारे फुटू लागल्याने पर्याय मिळत आहे. यातूनच भाजपचा अस्पृष्यपणाही राखला जाईल आाणि मध्यम मार्ग म्हणून अजितदादासोबत राहून सत्तेची फळेही मिळतील असा मध्यम मार्ग काढला जात आहे. हेही वाचा : मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ? अशा स्थितीत आमदार पाटील यांची आगामी रणनीती काय असेल हे सध्या तरी गुलदस्त्यात असले तरी माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अजितदादांची घेतलेली भेटही राष्ट्रवादीमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक अस्वस्थ करणारी ठरली आहे. याची दखल खुद्द आमदार पाटलांना घ्यावी लागली. त्यांनी जातीने विजय बंगल्यावर जाउन चहापाणीही घेतले. यातूनच जायचा तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला आहे. ही अस्वस्थता कमी करण्यासाठीच लोकनेते राजारामबापू यांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असावा. कार्यक्रम महापालिकेचा म्हणजेच शासकीय होता. तरीही कार्यकमास गर्दी होती ती राष्ट्रवादीचीच. आमंत्रित असूनही भाजपचे पदाधिकारी अनुपस्थित राहिले. त्यांनीही आता नो जेजीपी, ओन्ली बीजेपीचा नारा दिला आहे. या अस्वस्थ राजकीय स्थितीत अजितदादांचा ५ फेबु्रवारीचा संभाव्य दौरा आणखी काय धक्के देणार याचीच काळजी आता मूळच्या राष्ट्रवादीला आहे.