सांगली : राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह घराघरापर्यंत पोहचवून वाळव्यानंतर पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या माजी उपमुख्यमंत्री आरआर आबांच्या वारसदारांना आता नवे चिन्ह घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यावेळी आबांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार तर स्वीकारलाच नाही, उलट मी एवढ केलं, तुम्ही माझी काय प्रतिष्ठा राखली असा सवाल करत आबांच्या कार्यकर्त्यांना निरूत्तर केले. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसपुढे विधानसभेसाठी आव्हानात्मक स्थिती निर्माण होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आर.आर.आबांनी पक्षात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळचे प्रतिनिधीत्व आबांच्या घरातच राहिले. गेल्या दोन निवडणुकीत आबांच्या वारसदारांना पराभूत करणे विरोधकांना शक्य झाले नाही. दोन तालुक्यांचा हा मतदार संघ असला तरी आबांनी राजकीय मोर्चेबांधणी भक्कम केली होती, यामुळे त्यांच्या वारसदारांना विजय मिळवणे फारसे कठीण बनले नाही. मात्र यात पारंपारिक विरोधक असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांनीही मवाळ भूमिका घेतली. कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे हे उमेदवार असताना खासदारही आमचा आणि आमदारही आमचाच ही तासगावकरांची घोषणा आबांच्या वारसदारांना अधिक लाभदायी ठरली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष 

आबांचा विजय अधिक सुकर व्हावा यासाठी आबा आणि काका यांच्यातील वाद मिटवण्यात आला होता. त्यातून राष्ट्रवादीने संजयकाका पाटील यांना विधानपरिषदेचे सदस्यही केले होते. मात्र, नवी पिढी राजकीय क्षेत्रात सक्रिय होऊ लागल्यानंतर या वादाला नव्याने फोडणी मिळाली असून खासदार पुत्र प्रभाकर पाटील हे भावी आमदार म्हणून रिंगणात उतरू लागले आहेत. तशी त्यांचीही मोर्चेबांधणी सुरूच आहे. या राजकीय संघर्षातून कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. बहुमत मिळाले असताना विरोधकांनी नगराध्यक्ष पद मिळवले.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आरआर आबांचे पुत्र रोहित पाटील यांनाच निश्चित मानली जात आहे. कार्यकर्त्याशी संपर्काचा थेट अभाव, चुलते सुरेश पाटील यांचा विकास कामात होत असलेला हस्तक्षेप आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या कार्याला असलेल्या मर्यादा यामुळे सामान्य माणूस ते लोकप्रतिनिधी यांच्यात एक अंतर पडत चालले आहे. आमदार पुत्र रोहित पाटील तर सध्या स्वत:च आमदार असल्यासारखे वागत असतात. राज्यभर एक वक्ता म्हणून फिरत असले तरी गाव पातळीवरची नाळ तुटत चालली आहे. आता राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजितदादांच्याकडे गेले असल्याने नवे चिन्ह घेऊन मतदारांना सामोरे जावे लागणार आहे. यावेळी आबांच्या वारसदारांची कसोटी लागणार आहे.

हेही वाचा : चावडी : प्रदेशाध्यक्षांच्या कबुलीने प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासगावमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे उघड अथवा, गुपित पाठिंबा राहणार नाही असा थेट इशारा मोटार अडवली असता दिला. आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचे टाळणाऱ्या व सत्कार न स्वीकारणाऱ्या अजितदादांनी खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांचा मात्र सत्कार स्वीकारला. यामुळे विधानसभेवेळी तासगावच्या रणमैदानावर आबा-काकांचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा नव्या युवा पिढीच्या रूपाने पाहण्यास मिळणार आहे.