Indian Political Unity Foreign Delegations : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. या मोहिमेनंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताने आणखी एक रणनीती आखली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारची सात शिष्टमंडळे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या शिष्टमंडळांना मंगळवारी (तारीख २० मे) काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी आणि त्यांची चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी भारताने नेमकी काय रणनीती आखली? ते जाणून घेऊ…
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तीन पथके बुधवारी (तारीख २१ मे) परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली. या दौऱ्यांदरम्यान पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पसरवली जात असलेली चुकीची माहिती खोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढ्यात इस्लामाबादची दुटप्पी भूमिका उघड केली जाणार आहे. सिंधू जलसंधी करारावरील भारताची भूमिकाही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीमापारच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या ‘नवीन सामान्य’ धोरणाची माहिती जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.
भारताने नेमकी काय रणनीती आखली?
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी (२० मे) जनता दल युनायटेडचे नेते संजय कुमार झा, शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे व द्रमुकचे खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील तीन शिष्टमंडळांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या दौऱ्यात परदेशातील मंत्र्यांपासून ते खासदार, विचारवंत, शास्त्रज्ञ, पत्रकार, नागरी संस्थांचे सदस्य आणि अन्य नागरिकांच्या भेटीगाठी घ्या, असे त्यांना सांगण्यात आले. “विदेशांतील भारताचे राजदूत आणि दूतावास आधीपासूनच या भेटी निश्चित करण्यासाठी काम करीत आहेत,” असे शिष्टमंडळातील एका सदस्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापूरला भेट देणाऱ्या या शिष्टमंडळांचे प्रमुख संजय कुमार झा म्हणाले, “भारताने आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे. मात्र, आता त्यांच्या कुरापती सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत.”
पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई नाहीच!
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संजय कुमार झा म्हणाले, “पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची हत्या करणारे दहशतवादी सीमापार करून आले होते. आम्ही पाकिस्तानला त्या दहशतवाद्यांची माहितीही दिली होती. मात्र, त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम केले. त्यांची ही कृती आम्ही जागतिक स्तरावर मांडणार आहोत.” पुढे बोलताना झा म्हणाले, “संपूर्ण जगाला माहीत आहे की, २६/११ मुंबई हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसंबंधित किती पुरावे पाकिस्तानला दिले होते; पण त्यांनी लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. जे गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडेच आपल्याकडून पुरावे दिले जात आहेत; मग कारवाई होणार तरी कशी, असा प्रश्नही खासदार झा यांनी उपस्थित केला.
“ऑपरेशन सिंदूर ही फक्त सुरुवात”
“पाकिस्तान हे सामान्य राष्ट्र नाही, तेथील प्रशासकीय यंत्रणाही लष्कराकडून चालवली जाते. पाकिस्तान आता स्वतःला पीडित म्हणवून घेऊ शकत नाही. आम्ही ज्या देशांना भेट देणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की, भारत आता कारवाई करणार आहे. भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ ही फक्त सुरुवात आहे. आता पुरे झालं; पाकिस्तानचा अतिरेकीपणा आम्ही आता अजिबात सहन करणार नाही”, असेही खासदार झा यांनी म्हटले आहे.
शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातही शिष्टमंडळं विविध देशांत भारताची भूमिका मांडण्यासाठी रवाना होत आहेत. बुधवारी आमचं पथक यूएई आणि पश्चिम आफ्रिकेसाठी रवाना होईल. त्याआधी परराष्ट्र मंत्रालयानं सर्व शिष्टमंडळांना देशनिहाय माहिती दिली आहे. भारतावर झालेल्या मागील दहशतवादी हल्ल्यांचीही याबाबत उदाहरणं देण्यात आली आहेत. ही माहिती आमच्या दौऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही इतर देशांना पाकिस्तान आणि दहशतवादामुळे भारतावर आलेल्या संकटांविषयी जागरूक करू. शिष्टमंडळ भेट देणार असलेल्या त्या त्या प्रत्येक देशाला या संदर्भातील माहितीपत्रक देणार आहे.”
शिष्टमंडळातील सदस्यांना कोणत्या सूचना?
श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळातील एका सदस्याने सांगितले, “खासदारांना पाकिस्तानमधून चालविण्यात येणाऱ्या विविध दहशतवादी हल्ल्यांविषयी बोलायला सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान हा कसा दहशतवादाचा अड्डा होत चालला आहे, याची आम्ही पोलखोल करणार आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल आम्ही बोलणार आहोत. पाकिस्तान सध्या खोटी माहिती पसरवत आहे. त्यांचा अपप्रचार खोडून काढणं अत्यावश्यक झालं आहे.”
हेही वाचा : Operation Sindoor : शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शिष्टमंडळातील अनेक खासदारांनी परराष्ट्र मंत्रालयाला सिंधू जलसंधीबाबत आणि भारताच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले. त्यावर परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले की, सिंधू जलसंधीबाबतचा निर्णय अचानक घेतला गेलेला नाही. भारत आधीपासूनच या करारावर काम करीत होता. १९६० च्या दशकापासून बरंच काही बदललं आहे. नद्यांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्याशिवाय सिंधू करार हा सद्भावनेच्या आधारे केला गेला होता; पण दहशतवादामुळे जेव्हा सद्भावनाच उरत नाही, तेव्हा करार कसा टिकू शकतो?
“अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती”
शिंदे यांच्या शिष्टमंडळातील एका दुसऱ्या सदस्याने सांगितले की, सरकारने पहलगाम हल्ल्यापासून ते या महिन्यात घोषित करण्यात आलेल्या युद्धविरामापर्यंत घडलेल्या घटनांची क्रमवार माहिती दिली. “आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की, युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती, व्यापाराविषयी कोणताही संवाद नव्हता. हा युद्धविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पातळीवर झाला,” असे ते म्हणाले.
दक्षिण आशियातील दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळातील आणखी एका सदस्याने सांगितले, “सरकारने आजपर्यंत जाहीरपणे जे काही सांगितले आहे, त्याची सविस्तर माहिती आम्हाला देण्यात आली आहे. आम्हाला त्याच गोष्टी ठामपणे मांडायच्या आहेत. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, निवडलेल्या देशांपैकी १५ देश सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत आणि पाच देश लवकरच सदस्य होणार आहेत. आम्हाला आमच्या दौऱ्याआधी वाचनासाठी काही साहित्यही देण्यात आले आहे,” असेही ते म्हणाले.