केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विश्वासू सहकारी आणि शिवपुरीचे अनुभवी नेते बैजनाथ सिंह यांनी मार्च २०२० मध्ये सिंधिया यांच्यासह बंडखोरीचे निशाण फडकवून भाजपामध्ये प्रवेश केला होता. ज्यामुळे मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार कोसळले होते. त्या घटनेला आता दोन वर्ष पूर्ण झाले असून बैजनाथ सिंह यांची घरवापसी झाली आहे. बैजनाथ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशाचा एक भव्य इव्हेंट केला गेला. शिवपुरी ते भोपाळ असा ३०० किलोमीटरचा प्रवास ७०० वाहनांच्या ताफ्यामधून करत बैजनाथ काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह डेरेदाखल झाले. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बैजनाथ म्हणाले, “मी ७०० वाहनांचा ताफा आणून एकप्रकारे तिकडे ‘संदेश’ दिला आहे. माझे आणि सिंधिया यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध राहिले आहेत. मी सिंधिया यांच्यासह भाजपामध्ये गेलो. पण तिथे माझी घुसमट झाली. आज मी मुक्त होत आहे. काँग्रेसमध्ये परतल्याबद्दल मला आनंद वाटतोय.”

७३ वर्षीय बैजनाथ सिंह यांची भोपाळ येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते वाट पाहत होते. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बैजनाथ यांच्यासमवेत भाजपाचे १५ जिल्हापातळीवरचे नेतेही काँग्रेसमध्ये दाखल झाले.

कमलनाथ यांनी बैजनाथ यांचे स्वागत करत असताना सिंधिया यांनाही उपरोधिक टोला मारला. ते म्हणाले, “आज मला खूप आनंद वाटत आहे. कारण बैजनाथ हे काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी आलेले नसून ते सत्यासाठी इथे आले आहेत. मी काही महाराजा नाही, माझ्याकडे राजवाडा नाही. तुम्ही आजवर फक्त महाराजाला पाहिले, यापुढे आता कमलनाथलाही पाहून घ्या”

हे वाचा >> कर्नाटकची पुनरावृत्ती मध्य प्रदेशमध्ये होणार? राहुल गांधी म्हणतात, आम्ही १५० जागा जिंकू

बैजनाथ यांनी तरुण असताना राजकारणात प्रवेश केला होता. त्यानी शिवपुरी भूमी विकास बँकेचे संचालक पद अनेक दशके सांभाळले. दिग्विजय सिंह यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांनी बैजनाथ यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना जयवर्धन सिंह म्हणाले की, बैजनाथ हे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते आहेत. सिंधिया यांच्यासह त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षांनंतर त्यांना आता सत्य उमगले आहे. कमलनाथ करत असलेले प्रयत्न त्यांना दिसले आणि त्यांनी पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय घेतला.

भाजपामध्ये गेलेले काँग्रेसचे नेते तणावात

जयवर्धन पुढे म्हणाले की, सिंधिया यांच्यासोबत भाजपामध्ये गेलेल्या लोकांची अडचण झाली आहे. भाजपामध्ये विचारसरणी नसल्यामुळे हे सर्व नेते तणावात आहेत. भाजपामधील अनेक नेत्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवून आम्ही सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहोत. शेवटी लोकांच्या मताचा आदर केला पाहीजे.

सिंधिया यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपा संघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. सिंधिया यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार १५ महिन्यात पाडले होते.(ज्यामध्ये सहा विद्यमान मंत्र्यांचा समावेश होता) तेव्हापासून मागचे दोन वर्ष भाजपा सिंधिया यांच्यासोबत आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजपाच्या लोकांना प्रसंगी बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे काही प्रमाणात भाजपामध्येही नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका नेत्याने दिली.

हे वाचा >> कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैजनाथ भाजपामध्ये नाराज होते, त्यांना आमदारकीच्या तिकीटासाठी गृहीत धरण्यात आले नव्हते. पुन्हा काँग्रेसमध्ये परतणारे बैजनाथ एकमेव नेते नाहीत, भाजपा नेते यादवेंद्र सिंह यांनीही मार्च महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्याच पक्षात पाहणे भाजपाच्या काही नेत्यांना रुचलेले नाही. काही जागांवर सिंधिया यांचे विश्वासू आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. अशावेळी तिकीट वाटपात मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नेते नाराज आहेत.

ग्वाल्हेर मधील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, जर सिंधिया यांच्या निकटवर्तीयांनी पुन्हा काँग्रेसचा रस्ता धरला तर त्यांचा आणखी अवमान होईल आणि त्यांचे नेतृत्व कमकुवत असल्याचे दिसेल. हाच संदेश आम्हाला भाजपापर्यंत पोहोचवायचा आहे की, त्यांनी सिंधिया यांना पक्षात घेऊन आणि वर चांगले पद देऊन मोठी चूक केली. ज्या लोकांनी सिंधिया यांना साथ दिली आणि त्यांना त्याबदल्यात काहीच मिळाले नाही, ते लोक अस्वस्थ आहेत. आम्ही पडद्यामागे राहून काम करत आहोत, लवकरच तिथला कॅम्प उघडा पडेल.

काँग्रेस नेते रोज उठून सिंधिया यांचे नाव न घेता त्यांना टोमणे मारत असतात. नुकतेच प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराची एकप्रकारे सुरुवात केली. कमलनाथ आपल्या भाषणात म्हणाले की, ज्या लोकांनी सत्तेसाठी पक्ष सोडला त्यांच्यासाठी दुःख वाटते. कारण भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांना सत्तेत वाटा मिळाला नाही.

हे ही वाचा >> भाजपाच्या २२० महिन्यांच्या सत्तेत २२५ घोटाळे झाले; प्रियंका गांधींची टीका, मध्य प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात

सिंधिया यांना बोलण्याचे तारतम्य नाही

काँग्रेसने मे महिन्यात भाजपाचे गुना लोकसभा मतदारसंघाचे खासदार केपी यादव यांचा एका व्हिडिओवरून सिंधिया यांच्यावर टीका केली. २०१९ साली केपी यादव यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा १ लाख २५ हजार ५४९ एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला. तेव्हा सिंधिया काँग्रेसचे उमेदवार होते. केपी यादव हे एका व्हिडिओमध्ये म्हणाले की, काही लोक इतके मुर्ख असतात की मंचावरून काय बोलावे इतके तारतम्य त्यांना नसते आणि असे लोक स्वतःला विचारवंत म्हणवून घेतात. “तुम्ही आता भाजपामध्ये आहात हे विसरून तुम्ही कसे काय वक्तव्य करू शकता. भाजपाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. मंचावर केंद्रीय मंत्री आणि इतर मोठे नेते उपस्थित असताना तुम्ही म्हणतात की, २०१९ साली तुमच्याकडून चूक झाली.”, असे विधान केपी यादव यांनी एका व्हिडिओमध्ये केले होते.

काँग्रेसने हा व्हिडिओ व्हायरल करत असताना केपी यादव हे सिंधिया यांच्याबद्दल बोलत असल्याचे सांगितले. शिवपुरी येथे वैश्य आणि जैन समाजाचा संमेलन झाले होते, त्यात भाषण करत असताना सिंधिया यांनी भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली होती. सिंधिया त्यावेळी म्हणाले, “लोकांनी इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा जैन तत्वज्ञान आत्मसात करून क्षमा याचना करावी. माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा.”

यादव यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, ते सिंधिया यांच्याबद्दल बोलले नव्हते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यादव यांना समज देऊन सिंधिया यांच्या विरोधात जाहीरपणे बोलू नये, असे सांगितल्या नंतर यादव यांचे स्पष्टीकरण आले होते. “जे लोक अनेक दशकांपासून भाजपामध्ये आहेत, त्यांना सिंधियासोबत आलेल्या लोकांचा राग येतो. ते लोक फक्त तीन वर्षांसाठी पक्षात आले असून सत्तेचे पद उपभोगणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. आमचा विचारधारा असलेला पक्ष आहे. तर काँग्रेसकडे सत्तेच्या लालसेशिवाय दुसरे काहीच नाही. याच कारणामुळे मूळ भाजपाच्या लोकांना सिंधिया यांच्या लोकांसह प्रत्यक्षात काम करणे अवघड जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

आणखी वाचा >> मध्य प्रदेशात लग्नाच्या आधी वधूची गर्भधारणा चाचणी का करण्यात आली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाचे प्रवक्ते हितेश वाजपेयी म्हणाले, “सिंधिया यांच्यासह काही लोक भाजपामध्ये आले, त्यांना सत्तेत पद मिळवण्याची इच्छा होती. भाजपाने त्यांना जागा मिळवायची असेल तर अथक परिश्रम करावे लागतील. बैजनाथ यांनी जो गाड्याचा ताफा काढला, ते सरंजामशाहीचे उदाहरण आहे आणि देशातील लोकांना सरंजामशाही बिलकूल आवडत नाही.”