दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत माघार घेताना भाजपने संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपत असल्याचे विधान केले आहे. मात्र भाजपच्या या नीतीचा संदर्भ पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जात आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदाराच्या पत्नी विरोधात निवडणूक लढवताना भाजपची संस्कृती कुठे गेली होती?  की त्या निवडणुकीत बिनविरोधच्या संकल्पनेची वल्गना अशी खिल्ली उडवणाऱ्या भाजपचा दणदणीत पराभव झाल्याने आता पुन्हा तसाच पराभव होऊ नये यासाठी भाजपने ही दुटप्पी भूमिका घेतल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस यांची खेळी; आशिष शेलार तोंडघशी

हेही वाचा >>> रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवेंना झटका

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. शिंदे – भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली. त्यावर राज्यात राजकीय प्रभाव कोणाचा याचे उत्तर देणारी निवडणूक म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीकडे पाहिले जात होते. या निवडणुकीत भाजप मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल, असे ट्विट मोहित कंबोज यांनीही केले होते. तर शिवसेनेनेही या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा केला होता. शिवसेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. सोमवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संवेदनशील राजकारण आणि संस्कृती जपण्यासाठी भाजप निवडणुकीतून माघार घेत आहे, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.भाजपच्या या निर्णयाचा संदर्भ पश्चिम महाराष्ट्राची जोडला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला संवेदनशील राजकारण संस्कृती जपायचे माहीत असते तर कोल्हापूर, पंढरपूर पोटनिवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला नसता, असे म्हणत याकडे लक्ष वेधले आहे. भाजपचा संवेदनशीलतेचा संबंध नसून पराभवाच्या भीतीने माघार घेतल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत माघारीची भाजपवर नामुष्की….

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. या मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. तेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर निवडणूक सर्व पक्षांनी बिनविरोध करावे, असे आवाहन केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना, डावे पक्ष यांनीही पाठिंबा दिला होता. तर, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी सतेज पाटील यांची बिनविरोध निवडणूक ही वल्गना आहे, अशी थट्टा उडवून आव्हान उभे केले होते. विशेष म्हणजे सत्यजित कदम यांनी याआधी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

राज्यात महाविकास आघाडीचे अस्तित्व अधिक ठळक की भाजपचे, याचा कौल देणारी निवडणूक म्हणून याकडे संपूर्ण राज्यातून पाहिले गेले. प्रतिष्ठेसाठी दोन्ही पक्षांकडून साम-दाम-दंड-भेद नीती वापरली गेली. दोन्ही पक्षांनी पैशाचा मुबलक वापर केला जात असल्याच्या पोलिसांत तक्रारी  केल्या होत्या. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपला पराभूत व्हावे लागले होते. विशेष म्हणजे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, माजी नगरसेविका आणि विद्यमान काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांच्यासह संपूर्ण जाधव घराणे हे मूळचे भाजपचे होते. तरीही तेव्हा भाजपने संवेदनशील राजकारणाचा प्रत्यय का दाखवून दिला नाही, असा प्रश्न कोल्हापुरात समाज माध्यमातूनही उपस्थित केला जात आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहेत. येथील अनेक चाकरमानी मुंबईत राहतात. त्यांनी लटके यांच्या पाठिशी राहण्याची भूमिका घेतली होती. ती याही निवडणुकीत कायम ठेवत ऋतुजा लटके या शाहुवाडीच्या सूनबाई विजयी करण्याचा निर्धार पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एका मेळाव्यात व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur to andheri assembly election bjp role in the by elections print politics news ysh
First published on: 17-10-2022 at 18:27 IST